| उरण | प्रतिनिधी |
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशातही जाणवू लागला असून, सर्वच वस्तूंमध्ये महागाई वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरचा तुटवडा तीव्र झाला असून, उरण तालुक्यात नागरिक आणि व्यावसायिक दोघेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशातच आता येथील शकुंतला गॅस एजन्सीने उरण-करंजा रस्त्यालगत शेतामध्ये विनापरवानगी गोडाऊन सुरू केल्याचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने उरणमधील अनेकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद केले आहेत; तर, काही जण चुलीवर व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. घरगुती सिलेंडरही 35 ते 40 दिवसांनी मिळत असल्याने महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेक घरांमध्ये पुन्हा चुलीचा वापर वाढला आहे. उरण तालुक्यात पुष्पक गॅस एजन्सी आणि शकुंतला गॅस एजन्सी मार्फत सिलेंडर पुरवठा केला जातो. मात्र, यापैकी शकुंतला गॅस एजन्सीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीचे गोडाऊन उरण-करंजा रस्त्यालगत भर शेतामध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे. गॅस गोडाऊन चालवण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असताना, याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याची माहिती चाणजे ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली आहे.
ग्रामसेवक चव्हाण यांनी याबाबत कोणताही अर्ज सादर झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित गोडाऊन बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा संशय अधिक बळावला आहे. याबाबत त्यांनी या गॅस एजन्सीला लेखी पत्र देऊन त्यांचे म्हणणे 7 दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी शेतामध्ये चारही बाजूंनी जाळी घालून गॅस सिलेंडर साठवणूक व विक्री केली जात असून, सिलेंडर अव्वाच्या सव्वा दराने विकले जात असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बेकायदेशीर गोडाऊन त्वरित बंद करावे, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







