| रायगड | प्रतिनिधी |
भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, पनवेल, पोलादपूर, कर्जत यासह अन्य तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊल बरसला. जिल्ह्यात सध्या भाताचे पीक तयार झाले आहे, असे असताना अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काळे ढग दाटून आल्यान दुपारनंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. सध्या दिवाळीच्या सणा निमीत्त बाजारपेठा सजल्या आहेत. छोट्या व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटली आहेत, मात्र पावसामुळे साहित्या भिजण्याची शक्यता असल्याने त्यांनी साहित्याची बांधाबांध केली. पावसामुळे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडू शकले नाहीत. बाजापपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
दिवाळी सणावर पावसाचे विरजण
कर्जत तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून विविध ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा एकदा संकटात जाण्याची शक्यता आहे, तर दिवाळी सणासाठी खरेदी करण्यावर देखील विरजण पडले आहे. अवकाळी पावसाने व्यावसायिकांची आर्थिक गणितं देखील बिघडवली आहेत. हवामान खात्याने अवकाळी पावसाचा शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गेली दोन दिवस वातावरणात असलेला उकाडा पाहता पाऊस येणार अशी खात्री शेतकऱ्यांना पटली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी अनेक उपाय करून ठेवले होते, त्यात भाताच्या मोळ्यांचे पावसापासून रक्षण व्हावे म्हणून प्लास्टिकचे आच्छादन घालून घेतले होते. सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने भाताच्या शेतातील भाताची पीक कोसळून पडली. सुमारे दीड तास पावसाने थैमान घातल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. असात पाऊस सुरू राहीला, तर मात्र भाताचे पीक जमिनीवर कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
![](http://krushival.in/grygrars/2023/11/PHOTO-karjat-paus-scaled-e1699451285771-1024x443.jpg)
दुसरीकडे दिवाळी सण सुरू होत असून मोठ्या प्रमाणात दिवाळी सणानिमित्त खरेदी करण्यासाठी लोक बाहेर पडली आहेत. तर अनेक ठिकाणी खरेदीच्या वस्तू रस्त्यावर मांडून ठेवून व्यवसाय केले जात आहेत. त्या सर्वांना आजच्या अवेळी पावसाने मोठा धक्का दिला. कर्जत तालुक्यातील प्रत्येक भागात अवकाळी पाऊस आल्याने दिवाळी सणाच्या खरेदीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला. दिवाळी सण सर्वात मोठा सण समजला जातो आणि त्यामुळे या सणाची खरेदी मोठया प्रमाणावर होत असल्याने व्यापाऱ्यांनी देखील मोठा माल खरेदी करून ठेवला आहे. त्यांना मोठा फटका या पावसामुळे बसण्याची शक्यता आहे. नेरळ गावातील बाजारपेठमध्ये बुधवार हा आठवडा बाजार असतो आणि त्या बाजारात दिवसभर खरेदीसाठी मोठी गर्दी असते. अवकाळी आलेल्या पावसामुळे आठवडा बाजारात शुकशुकाट होता.
माथेरान ओलेचिंब
माथेरानमध्ये दुपारपासून वातावरणात गारवा निर्माण झाला होता.त्यानंतर पाऊस कोसळला. तब्बल सव्वा महिन्याने माथेरानमध्ये पाऊस कोसळला असून या पावसामुळे दिवाळी पर्यटन हंगामाची तयारी करणारे माथेरानमधील व्यावसायिक आणि दुकानदार यांच्या दिवाळी तयारीला ब्रेक लागला आहे. माथेरानमध्ये मिनी ट्रेन सुरु झाली असल्याने पर्यटक देखील येऊ लागले आहेत, पण दिवाळी सणासाठी शहरातील सर्वत्र दुरुस्तीची आणि रंगरंगोटी यांची नवीन कामे यांचा वेग या पावसाने काहीसा मंदावला आहे.
अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान
पोलादपूर तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने कापणी होऊन शेतात उन्हामध्ये सुकायला ठेवलेले भात पिक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. पोलादपूर तालुक्यात बुधवारी सकाळपासून सुर्योदय न झाल्याने वातावरणामध्ये कमालीचा उष्मा वाढला होता. पोलादपूर शहरातील नागरिकांनी या वातावरणामुळे पावसाच्या शक्यतेने बाजारपेठेमधून आपआपल्या घरी मोर्चा वळविला तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतात जाऊन मळणीपूर्वी शेतामध्ये उन्हात सुकत टाकलेले कापणी झालेले भाताचे भारे गोळा करून तातडीने घरासमोरील मोकळया जागेत हलविण्याचा अपयशी प्रयत्न केला.
![](http://krushival.in/grygrars/2023/11/poladpur-scaled-e1699451438352-1024x284.jpg)
पोलादपूर तालुक्यात भातशेती विमा काढलेल्या आणि न काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या समसमान असून बुधवारी दुपारी झालेल्या पावसामुळे भातशेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची आवश्यकता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून तुटपुंजी भरपाई घेण्यापेक्षा भातशेतीसाठी केलेल्या श्रमाचा मोबदला देखील शासनाकडून मागण्याची गरज असल्याचे यावेळी तालुक्यातील गोवेले येथील साळवीकोंडचे ग्रामस्थ भगवान साळवी यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसांमध्ये राज्यसरकारकडे लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवेळी ग्रामीण भागातील मतदारांना उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षांकडून दिलेल्या आर्थिक आमिषानंतर आता अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास कोणताही स्थानिक नेता अथवा राजकीय पक्ष पुढे सरसावला नसल्याबद्दल यावेळी भगवान साळवी यांनी खंत व्यक्त केली.
शेतकरी वर्गामध्ये चितेंचे वातावरण
नागोठणे विभागासह सुकेळी, वाकण, बाळसई परिसरामध्ये बुधवार दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात गरमी वाढलेली होती. जणुकाही अवकाळी पाऊस येणार की काय अशी चिन्हे दिसत असतानाच बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. पंरतु या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंतिम टप्प्यात सुरू असलेल्या भात झोडणीची कामे करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाच्या पाण्यात भात भिजून नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पावसाने उडवली शेतकऱ्यांची तारांबळ
कोलाड परिसरात बुधवारी दुपारी 3 वाजता अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
![](http://krushival.in/grygrars/2023/11/KOLAD-e1699452154418-1024x429.jpg)
शेतात कापून ठेवलेल्या भाताच्या करपा गोळा करणे, मळणी रचणे, झोडलेले भात गोळा करणे यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. तसेच व्यावसायिक, कामगार, शालेय विद्यार्थी यांची ही या अवकाळी पावसामुळे तारांबल उडाली. दोन दिवसांपासुन वारवरणात कमालीच्या तापमानामुळे गर्मी जाणवत होती. यामुळे नागरिक पूर्णपणे हैराण झाले होते. पावसामुळे शेतीसह व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
वीजपुरवठा खंडित
तालुक्यात बुधवार दुपारी साडेतीन वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. शेतातील भाताचे पीक भिजल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यातूल वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्याच्या उष्माने नागरिक हैराण झाले होते. पावसामुळे बाजारपेठेत ऐन दिवाळी सणाच्या धामधुमती शुकशुकाट होता. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले.
भातशेती नुकसान भरपाईची मागणी
अवकाळी पावसाने मुरुड पंचक्रोशी भागात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे व संबंधित शेतकऱ्यांना ताबडतोब भरपाई मिळावी अशी मागणी मुरुड खारअंबोलीचे माजी सरपंच मनोज कमाने यांनी केली आहे.
![](http://krushival.in/grygrars/2023/11/murud1-e1699452237973-1024x376.jpg)
मुरुड पंचक्रोशी भागात भातपीकाची मोठी लागवड केली जाते. याच भात शेतीच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. चार महिने अथक परिश्रम घेऊन भाताचे पिक शेतात तयार झाले होते. भातकापणी व झोडणीच्या कामाला सुरूवात झाली होती. भाताच्या मळ्या करुन शेतातच त्या ठेवण्यात आल्या होत्या. पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे.