कृषी विभागाचा पुढाकार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
भात पिकांबरोबरच रब्बी हंगामात कडधान्य लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात 2 हजार 240 हेक्टर क्षेत्रावर हरभरा व मूग पिकांची लागवड करण्यावर भर देण्यात आली आहे. त्यासाठी पाच हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना एक हजार 37 क्विंटल कडधान्य दिले जाणार आहे. तालुका स्तरावर बियाणे देण्यास सुरुवात केली असून लवकरच शेतकऱ्यांना ही बियाणे मिळणार आहेत. या कडधान्य लागवडीतून शेतकऱ्यांना उभारी मिळणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील कडधान्य पीक पेरणीचे क्षेत्र 14 हजार 35 आहे. त्यात हरभरा 1076 हेक्टर व मुग दोन हजार 460 हेक्टर इतके आहे.
कडधान्य क्षेत्रात लक्षणीय वाढ करण्यासाठी कृषी विभागाने शंभर टक्के अनुदानावर हरभरा व मुग कडधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात हरभरा पीक एक हजार 275 हेक्टर व मुग पिक 965 हेक्टर क्षेत्रावर पिक प्रात्यक्षिकांचे नियोजन केले आहे. त्यामध्ये हरभरा 892.5 क्विंटल व मूग 144.75 क्विंटल दिले जाणार आहे. त्यासोबत बिज प्रक्रियेमध्ये रायझोबियम व पीएसबी, एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये फेरोमन, ट्रॅप्स, ल्यअर्स, किटकनाशक, बुरशीनाशक, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये सुक्ष्ममुल द्रव्ये आदी निविष्टांचा पुरवठा केला जाणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक बळ हरभरा, मुगाची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांना या पिकांच्या लागवडीतून बळकटीकरण मिळावे. यातून त्यांना रोजगाराचे साधन खुले व्हावे यासाठी हरभरा व मुग लागवडीवर भर देण्यात आला आहे. हे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांना यातून आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत कडधान्य पिक प्रात्यक्षिकांचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय बीज निगम व महाबीज मार्फत हरभरा व मूग बियाणांचे वाटप शेतकऱ्यां केले जाणार आहे. तालुकास्तरावर त्याचे वाटप सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी तालुक्यातील कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, पीक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी