स्वस्त इंधनाच्या ई-वाहनांचा वापर काळाची गरज

। पुणे । प्रतिनिधी ।
एकीकडे पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत तर दुचाकी, चारचाकी ई-वाहनांसाठी खरेदीमध्ये मोठी सवलत मिळत असून इलेक्ट्रिक चार्जिंगद्वारे स्वस्त इंधन देखील उपलब्ध होत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झाली आहे असे मत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवार 4 एप्रिल रोजी व्यक्त केले. महावितरणने सुद्धा राज्य शासनाची राज्य नोडल एजन्सी म्हणून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्ससाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास वेग दिला आहे असेही त्यांनी सांगितले.
ऊर्जामंत्रीराऊत म्हणाले की, राज्य शासनाने ई-वाहन धोरणामध्ये ई-वाहनांच्या खरेदीमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी मोठे अनुदान जाहीर केले आहे. त्याप्रमाणे दुचाकी ते चार चाकी प्रवासी व मालवाहतूक ई-वाहनांच्या खरेदीमध्ये 10 हजार ते 20 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यासोबतच सर्व इलेक्ट्रिक वाहनांना रस्ते करांमधून माफी देण्यात आली आहे. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर 100 रुपयांपेक्षा अधिक झालेले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलवरील वाहनांच्या इंधनासाठी प्रति किलोमीटर 7 ते 8 रुपयांचा खर्च येतो. मात्र इलेक्ट्रिक चार चाकी वाहनांसाठी प्रति किलोमीटर 1 रुपया 70 पैसे तर दूचाकी ई-वाहनांसाठी प्रति किलोमीटर केवळ 85 पैसे खर्च येईल. सोबतच केवळ बॅटरी बदलण्याखेरीज इतर देखभाल व दुरुस्तीचा नियमित खर्च नसल्याने सद्यस्थितीत ई-वाहनांचा वापर ही काळाची गरज झालेली आहे.
पहिल्या टप्प्यात 50 नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये पुणे-18, नवी मुंबई- 10, ठाणे- 6, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर व अमरावती येथे प्रत्येकी 2 तसेच नागपूर येथील 6 चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे अशी माहिती प्रसाद रेशमे यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले तर सचिन तालेवार यांनी आभार मानले.यावेळी प्रसाद रेशमे, किशोर परदेशी, अंकुश नाळे, संजय मारूडकर, सचिन तालेवार चंद्रमणी मिश्रा यांची उपस्थिती होती.

Exit mobile version