ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासासाठी करा- उदय सामंत

| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे, तसेच कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरिक येथून समाधानी होऊन जाईल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. चरवेली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

या नूतन इमारतीचा उपयोग विकासात्मकदृष्ट्या काम करण्यासाठी करा. येथील विकासकामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, या इमारतीमध्ये सभागृहासाठी पुढच्या वर्षी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. चरवेली गाव मुंबई-गोवा महामार्गावर वर असल्याने त्याला वेगळे महत्त्व आले आहे. या ग्रामपंचायतीसमोर संरक्षक भिंत उभारावी, निधी कमी पडल्यास आपण निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून देणार्‍या प्रदीप सावंत व शशिकांत सावंत यांचा सत्कारही सामंत याच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माधवी गीते, पंचायत समिती सदस्या श्रीमती पाटणे, संगमेश्‍वर पंचायत समिती सभापती माने, राजेंद्र महाडिक, प्रमोद पवार, प्रांतधिकारी विकास सूर्यवंशी, गटविकास अधिकारी रेवणकर, ग्रामपंचायत कोळंबेचे रघुनाथ पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version