| मुंबई | प्रतिनिधी |
विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईने आपला दरारा कायम ठेवताना विजयाचा चौकार मारला. सलग चौथा विजयही फार मोठ्या फरकाने मिळवताना पुदुचेरीवर सात विकेट आणि तब्बल 225 चेंडू राखून मात केली.
मुंबईच्या वेगवान माऱ्यापुढे पुदुचेरीच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. अवघ्या 24.4 षटकांत त्यांचा डाव 67 धावांत संपला, मुंबईने हे आव्हान 12.3 षटकांत पार केले असले तरी तीन फलंदाज गमावले. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला. तो 8 धावाच करू शकला. गेल्या सामन्यातील शतकवीर जय बिस्ताने 17 धावा केल्या; परंतु त्यासाठी त्याने 31 चेंडू घेतले. वेगवान गोलंजाजीसाठी पोषक असलेल्या सकाळच्या वातवरणात तुषार देशपांडेने फारच भेदक मारा केला. त्याने 11 धावांच 4 विकेट मिळवल्या. त्यानंतर शम्स मुलानी आणि अथर्व अकोलेकर यांनी प्रभाव पाडला. पुदुचेरीकडून परमेश्वरन शिवरामन याची 19 धावांची खेळी सर्वाधिक ठरली.
सलग चौथ्या विजयासह मुंबई ‘अ’ गटात 16 गुणांसह आघाडीवर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची निव्वळ सरासरी 3.106 अशी अतिशय बळकट आहे. मुंबईचा पुढील सामना सौराष्ट्रविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.