अफकॉन कंपनीविरोधात गावकऱ्यांमध्ये उसळली संतापाची लाट
| उरण | प्रतिनिधी |
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अफकॉन कंपनीने उखडून टाकला आहे. परिणामी, अंत्यविधीसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना उखडलेल्या चिखलमय रस्त्यातून वाट काढत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ भरपावसात आली आहे. त्यामुळे अफकॉन कंपनीविरोधात नातेवाईक मंडळी, गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत अफकॉन कंपनीच्या माध्यमातून रेवस-करंजा या सागरी उड्डाण पुलाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सदर कंपनीने समुद्रकिनाऱ्यावरील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा गावकऱ्यांना विश्वासात न घेता उखडून टाकल्याने त्याचा नाहक त्रास हा सर्वाधिक करंजापाडा, नागपाडा, बोबडीपाडा येथील शेतकरी, कोळी बांधवांना सहन करावा लागत आहे. जगदीश लक्ष्मण म्हात्रे या रहिवाशाचा मृत्यू रविवारी (दि.3) झाल्याने त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ही त्यांचे नातेवाईक, गावकरी मंडळीवर उखडलेल्या चिखलमय रस्त्यातून वाट काढत येण्याची वेळ आली आहे. भरपावसातून जगदीश म्हात्रे यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाताना त्यांच्या नातेवाईक, गावकरी मंडळींना संघर्ष करावा लागला. त्यामुळे अफकॉन कंपनीविरोधात गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अफकॉन कंपनीचे अधिकारी गावकरी, शेतकरी, कोळी बांधवांना विश्वासात घेऊन कोणत्याही प्रकारचे काम करत नाहीत. त्यांनी ‘हम करो सो’ या कायद्याच्या कक्षेत राहून या परिसरातील गावकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता उखडून टाकल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱ्या गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडत आहे. हे अफकॉन कंपनीने थांबविणे गरजेचे आहे. नाहीतर जनतेत उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही.
सचिन डाऊर,
सामाजिक कार्यकर्ते






