सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी?
। रत्नागिरी । वार्ताहर ।
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या रिफायनरीसाठी जमिनीचे, मातीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी, रिफायनरीविरोधक आंदोलकांनी ड्रोन सर्व्हे, माती परीक्षणाला विरोध केला होता. यावेळी पोलिसांसोबत मोठी बाचाबाचीदेखील झाली. स्थानिकांचा विरोध पाहता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले नाही. त्यानंतर आज पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलक मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. रिफायनरिला स्थानीक जनतेचा प्रखर विरोध असताना कोणत्या आधारावर ही रिफायनरी आणली जातेय? सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी, असा प्रश्नदेखील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
महिलांचा रस्त्यातच ठिय्या, ग्रामस्थ आक्रमक
स्थानिक रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षण रोखल्यानंतर आज पुन्हा सर्वेक्षण होणार होतं. मात्र निलेश राणेंच्या गाडीचा ताफा येताच ग्रामस्थ आक्रमक होताना दिसले. त्यांनी हा ताफा अडवला. यावेळी महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला. दरम्यान, आंदोलकांच्या तीव्र विरोधामुळे पोलीस अधिक सतर्क झाले होते. कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण न करू देण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राणेंचं आता समर्थन कशासाठी? असा सवाल इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तर रिफायनरीचं सर्वेक्षण तातडीनं थांबविण्याची बारसू येथील ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांचा रोष पाहताच निलेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आम्ही चर्चेसाठी तयार असून या चर्चेतून मार्ग निघू शकतो असे निलेश राणे म्हणाले आहेत.