| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेशाचा उत्सवाला आठ दिवसांनी सुरुवात होणार आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. प्रशासनाने, प्राधान्याने खड्यांची दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावर्षी सुद्धा गणरायाच्या आगमण व विसर्जन मार्गात खड्यांचे विघ्न कायम असणार असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रशासन रस्त्यांची कामे करणार नाहीत, फक्त नागरिकांना भूलथापा दिल्या जातात, त्यांच्या कडून कामाची अपेक्षा राहिलेली नाही असा नागरिकांचा सूर आहे. प्रशासनाने खड्डे भरण्याची वाट न पाहता, शेतकरी कामगार पक्षाचे खंडाळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनोद पाटील यांनी स्व-खर्चाने अलिबाग पेण मुख्य रस्त्यावरील वाडगाव फाटा ते पिंपळभाटपर्यंतचे अपघातग्रस्त खड्डे जेसीबीच्या सहाय्याने खडी व माती टाकून भरले आहेत. यावेळी त्यांच्या समवेत मनोहर पाटील, साहिल पाटील, निखिल पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





