निधीअभावी पुनर्बांधणी रखडली; प्रवास करणे झाले धोकादायक
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील अनेक गावे तसेच वाड्या-वस्त्यांना जोडणारे पूल, साकव धोकादायक झाले आहेत. त्या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे जिल्हा परिषदेच्यामार्फत मागणी करण्यात आली आहे. पण अद्यापही जिल्हा नियोजन मंडळाकडून रोहा तालुक्यातील पुलांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील रोहा तालुक्यातील संबंधित गावातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे. याशिवाय पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील पुलांची बिकट अवस्था पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील काही पूल वाहून गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. काशिद या पर्यटनस्थळाजवळ असणारा साकव वाहून गेल्याने मुरुडचा संपर्क तुटला होता. रोहा तालुक्यातील न्हावे गावाकडे जाणार्या रस्त्यावरील पूल तसेच बोबडघर व टेमघर साकव, पाले वरवडे, भिसे तसेच नेहरूनगर (खैरवाडी) येथील पुलांची पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे. तर कोंडगाव येथील पुलाची दुरुस्ती आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दिला आहे.
या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. रोहा शहरातील विविध मंदिरे, नदी संवर्धन प्रकल्प, भुयारी गटार योजना, नवीन शहर सभागृहासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी मंजूर केला असताना ग्रामीण भागातील या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर केला असता तर रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने देखील पालकमंत्री यांना धन्यवाद दिले असते. पण अद्याप या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे पावसाळ्यात तालुक्यातील जनतेला जीव मुठीत धरून या पुलांवरून प्रवास करावा लागणार आहे.