। उरण । वार्ताहर ।
मध्य रेल्वेवरील नेरुळ-उरण उपनगरीय चौथी संपूर्ण मार्गिका सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. परंतु, या प्रकल्पामधील दुसर्या टप्प्यातील खारकोपर-उरणदरम्यानच्या कामाला विलंब झाला असून, आतापर्यंत या टप्प्यातील 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता ही कामे डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. परिणामी, तोपर्यंत रेल्वेने नेरूळवरून थेट उरणला जाण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नेरुळ-बेलापूर-खारकोपर-उरण उपनगरीय रेल्वे प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पामधील पहिल्या टप्प्यातील नेरुळ-बेलापूर, खारकोपरदरम्यानचे काम नोव्हेंबर 2018 मध्ये पूर्ण झाले आणि उपनगरीय रेल्वे सेवा प्रवाशांसाठी खुली झाली. सध्या या लोकल प्रवासासाठी प्रवाशांना 20 मिनिटे लागतात.
प्रकल्पाचा खर्च 1700 कोटींवर
भूसंपादन आणि अन्य अनेक समस्यांमुळे नेरूळ-उरण प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र प्रकल्पाचा पहिला टप्पा वेळेत पूर्ण झाला. दुसरा टप्प्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, प्रकल्पाचा एकूण खर्च 500 कोटी रुपयांवरून सुमारे 1700 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुसर्या टप्प्यात खारकोपर-उरणदरम्यानची भूसंपादनाची प्रक्रिया सिडकोकडून पूर्ण झाली असून, या टप्प्यातील 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी सिडकोकडून 67 टक्के, तर रेल्वेकडून 33 टक्के निधी उपलब्ध करण्याची तरतूद आहे. मात्र, सिडकोकडून संपूर्ण निधी मिळालेला नाही. तो उपलब्ध होताच या वर्षाअखेरपर्यंत दुसर्या टप्प्यातील काम पूर्ण करून नेरुळ-उरण संपूर्ण मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
पाच नवीन स्थानके सेवेत
दुसरा टप्पा पूर्ण होताच पाच नवी स्थानके सेवेत येणार आहेत. यामध्ये गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण या स्थानकांचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास नेरुळ आणि उरणवासियांबरोबरच अन्य प्रवाशांनाही फायदा होईल. यामुळे जेएनपीटी आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळही त्याला जोडले जाईल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला.