। रायगड । प्रतिनिधी ।
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान यांच्यात युद्धाचं सावट आहे. त्यातच गृह मंत्रालय सातत्याने उच्चस्तरीय बैठका घेत आहे. नुकतेच गृह मंत्रालयाने सिविल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याची सूचना सर्व राज्यांना दिली आहे. 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारची सूचना देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या निर्देशावर बुधवारी ( दि.07) देशातील 244 जिल्ह्यात सिविल डिफेन्स मॉक ड्रिल होईल. यामध्ये रायगड जिल्ह्यातील उरण अतिसंवेदनशील शहर घोषित करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ संवेदनशील 2 मध्ये रोहा, धाटाव आणि नागोठणे, अलिबाग, थळ आणि वायशेत या गावांचा समावेश आहे. तर संवेदनशील जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे.
मागील 7 दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेत आहेत. संभाव्य एक्शन प्लॅनवर काम केले जात आहे. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना मिळेल असा इशारा मोदींनी दिला आहे. गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सिविल डिफेन्स जिल्हा प्रतिनिधींसोबत गृह सचिवांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून, गृह सचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील. सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणार्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होईल.
2010 च्या सूचीनुसार 244 नागरिक सुरक्षा जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. या बैठकीत देशाची सुरक्षा आणि येणार्या आव्हांनाना तोंड देण्याची क्षमता याबाबत आढावा घेतला जाईल. 2010 च्या अधिसूचनेनुसार, सिविल डिफेन्स जिल्हे 3 कॅटेगिरीत विभागले गेले आहेत. कॅटेगिरी 1 मध्ये नवी दिल्ली, सूरत, वडोदरा, काकरापार, मुंबई, उरण, तारापूर, तालचेर, कोटा, रावत भाट्टा, चेन्नई, कलपक्कम, बुलंदशहर यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर यांचा कॅटेगिरी 1 तर ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड यांचा कॅटेगिरी 2 मध्ये समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांचा कॅटेगिरी 3 मध्ये समावेश आहे.
मॉक ड्रिलमध्ये काय होणार? 244 जिल्हे, तालुक्यात या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात येणार आहे. मॉक ड्रिल काळात ब्लॅकआऊट केले जाईल. बुधवारी सायरन वाजेल, लोकांना हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी लपण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. मॉक ड्रिलमध्ये काय काय करायचे हे शिकवले जाईल. एअर स्ट्राईकसारख्या स्थितीत लोकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या जातील. आपत्कालीन स्थितीत प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी मॉक ड्रिल महत्त्वाचे मानले जाते. या मॉक ड्रिलमुळे लोकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळू शकेल. तसेच, जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळता येईल. त्यामुळे, सर्वांनी या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होऊन माहिती घेणे आवश्यक आहे. सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल एक सराव आहे. हे लोकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करते. यामुळे लोकांचे प्राण वाचू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेक युरोपीय देशांमध्ये अशा मॉक ड्रिल नियमितपणे होतात. जिथे युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते, तेथील सरकार नागरिकांना बचावाचे मार्ग शिकवते. तज्ज्ञांच्या मते, सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल केवळ एक सराव नाही. तर, हे एक प्रशिक्षण आहे. यामुळे, आणीबाणीच्या स्थितीत नागरिकांना सुरक्षित कसे ठेवायचे हे शिकवले जाते. कठीण परिस्थितीत स्वतःची आणि इतरांची मदत कशी करायची हे समजते. युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ही ड्रिल खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे, या सरावाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार
* हवाई हल्ल्याच्या वेळी सायरन वाजवणे: हवाई हल्ला होणार आहे, हे लोकांना कळावे यासाठी सायरन वाजवणे आवश्यक आहे.
* नागरिकांना प्रशिक्षण देणे: शत्रूने हल्ला केल्यास नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव कसा करायचा, याचे प्रशिक्षण देणे.
* त्वरित ब्लॅक आऊट करणे: हल्ला झाल्यास त्वरित लाईट बंद करण्याची व्यवस्था करणे.
* महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण: महत्वाची ठिकाणे आणि इमारती लपवण्यासाठीत्यांची व्यवस्था करणे. म्हणजे, त्या ठिकाणांवर शत्रूची नजर पडणार नाही, अशा प्रकारे ती जागा झाकणे.
* सुरक्षित स्थळी जाण्याचा सराव: संकट आले तर लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे घेऊन जायचे, यासाठी आधीच सराव करणे.