। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वर्षभरापासूनचे थकीत मानधन देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील 1 हजार 727 आशा सेविकांसह राज्यातील 72 हजार आशा सेविकांनी आपल्या मागण्या मान्य न केल्यास गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. कोव्हीड काळात महत्वपुर्ण काम करणार्या आशा सेविकांना थकीत मानधन मिळत नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची कदर बाळगून शासनाने त्वरीत मानधन देण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनानुसार राष्ट्रयी आरोग्य अभियान मध्यवर्ती सरकारकडून माहिती व अहवाल अचूक संकलनासाठी दिले जाणारे 2 हजार मानधन पुर्णपणे दिले जात नाही. जुलै 2020 पासून सदरचे मानधन थकीत आहे. एप्रिल 2021 पासूनची मानधन वाढ देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने शासन निर्णयानुसार केलेली एक हजार रुपये वाढ चार महिने झाली तरी प्रत्यक्षात दिलीच नाही. 500 रुपये कोव्हीड भत्ता देखील दिला जात नाही. राज्यात 72 हजार आशा वर्कर आणि चार हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. केंद्र सरकार कोरोना कामाचे रोजचे 35 रुपये प्रमाणे महिन्याला एक हजार रुपये देते पण तेही वेळेत मिळत नाहीत. राज्य सरकार 4 हजार रुपये देते. पण आरोग्य विभागाची 72 प्रकारची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे तीन हजार रुपये मानधन कापले जाते. ग्रामीण भागात कोरोना काळात डॉक्टर्सची सर्व कामे आशा वर्कर करतात.