जनआंदोलन उभारण्याचा इशारा; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर
| माणगांव | वार्ताहर |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली 13 वर्ष सुरू आहे. अद्यापही अनेक टप्प्याचे कामकाज अपूर्ण आहे. महामार्गावर अपघाताची मालिका देखील सुरूच आहे. लवकरात लवकर महामार्ग व्हावा यासाठी मंगळवार दि.4 रोजी माणगांवमध्ये महामार्ग जनआक्रोश समितीच्या पुढाकाराने माणगांव आगार ते प्रांताधिकारी कार्यालय अशी टाळ-मृदंगाच्या गजरात पदयात्रा काढण्यात आली.
माणगाव आगार पासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने माणगावकर सहभागी झाले होते. यावेळी आदोलकांनी या महामार्गाकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. आजपर्यंत महामार्गावरून फक्त राजकारण केले जात असल्याने जनआक्रोश समितीने या विषयावरून आता जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने या पदयात्रा आंदोलनातून नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी संदीपान सानप यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच प्रशासकीय स्तरावर महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
13 वर्ष महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत सर्वांना सोबत घेऊन लढा लढणार आहे.
संतोष रणपिसे, जिल्हाध्यक्ष, महामार्ग जनआक्रोश समिती