वीज महावितरणने पंप हाऊसचा वीजपुरवठा केला खंडित
| पाली/बेणसे | वार्ताहर |
पालीकरांना पाणीटंचाईच्या संकटांने ग्रासले आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची आणी बाणी आली आहे. एकीकडे आंबा नदीची पाणी पातळी प्रचंड घटली आहे. तसेच जॅकवेल मधील गाळ काढण्यासाठी (दि.26) व (दि.27) पालीतील पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यातच गुरुवारी (दि.28) वीज महावितरणने नगरपंचायतचे तब्बल 10 लाख 30 हजार रुपये वीज बिल थकीत असल्यामुळे मोटर पंप हाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे तिसर्या दिवशी पालीकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले.
नगरपंचायतने फेब्रुवारीमध्ये पाणीपुरवठा मोटर पंप हाऊसचे विजबिल या महिन्यात भरले. पण या महिन्याचे (मार्च) पंप हाऊसचे तब्बल चार ते साडेचार लाखांचे वीजबिल अजूनही भरलेले नाही. याशिवाय स्ट्रीट लाईट व इतर वीज बिल मागील व चालू महिन्याचे भरलेले नाही मागील महिन्याचे व चालू महिन्याचे मोटर पंप व स्ट्रीट लाईट आणि इतर विज बिल मिळून एकूण 10 लाख 30 हजार रुपयांचे विज बिल थकीत आहे. वीज महावितरण बिल भरण्यासाठी अवधी देऊन देखील वीज बिल भरण्यात आले नाही. परिणामी नाईलाजाने वीज महावितरण ने येथील वीजपुरवठा खंडित केला आहे. आणि याचा फटका पालीकरांना बसला आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अघोषित पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ज्यांच्याजवळ कुठेही विहीर किंवा बोअरवेल नाही त्यांना लांबून पाणी आणावे लागते.
जॅकवेलमधील गाळ काढण्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. आजही गाळ काढण्याचे काम सुरू होते, त्यामुळे पाणीपुरवठा बंद होता. थकीत वीज बिल भरण्यात येईल.
विद्या येरूनकर,
मुख्याधिकारी, पाली
मागील व या महिन्याचे मोटर पंप व स्ट्रीट लाईट व इतर मिळून एकूण 10 लाख 30 हजार रुपयांचे वीज बिल थकीत आहे. नगरपंचायतीला दोन ते तीन वेळा वीज भरण्याच्या सूचना व अवधी दिला मात्र त्यानंतरही त्यांनी वीज बिल भरले नाही. त्यामुळे पंप हाऊसचा वीजपुरवठा खंडित केला.
उमाकांत सपकाळे,
उपकार्यकारी अभियंता,
वीज महावितरण, पाली