नागरिकांना कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा त्रास
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायत हद्दीतील हटलेश्वर चौक परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची गळती सुरू असून नागरिकांना कमी दाबाचे पाणी मिळत आहे. काही भागात तर पाणी पोहोचतच नाही. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळ्याची सुरुवात झाल्यामुळे पाण्याची गरज अधिक भासू लागली आहे. अशावेळी पाणी गळती होत असल्याने नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. कमी दाबामुळे घरगुती वापरासाठी पाणी साठवणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरण्यासाठी जास्त वेळ लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र तरीदेखील प्रत्यक्ष उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.







