| रायगड | प्रतिनिधी |
गेल्या वर्षी मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे पाच-सहा महिने सलग पाऊस झाला. नोव्हेंबरपर्यंत पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यांना बळकटी मिळाली होती. अधिक पाऊस पडल्याने पाणी टंचाईच्या झळा कमी होतील, असे सांगितले जात होते. मात्र,उन्हाळा सुरु होताच कोकणात पाणीटंचाईच्या झळांनी नागरिकांना कासाविस केले आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण 173 धरणांमध्ये मे अखेरपर्यंत फक्त 33.99 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 1.34 टक्क्यांनी घट झाली आहे. मोसमी पावसाला अद्याप काही दिवस बाकी असल्याने कोकणात पाणीटंचाईच्या झळा आणखी वाढणार आहेत. कोकणात सर्वसाधारणपणे दरवर्षी अडीच हजार ते तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो.
कोकणातील पाचही जिल्ह्यांत अनेक भागांमध्ये महापूर येणे हे नेहमीचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी येथील महापूराच्या घटनांनी हाहाःकार माजविलेला होता. त्यामुळे येथे पावसाळ्यातील पाण्याची उपलब्धता कशी आहे, हे दिसून येते. मोसमी हंगामात पडणारे पावसाचे पाणी हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून वाहत थेट समुद्राला जाऊन मिळते. मात्र, पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळा आला की कोरड्या पडतात. धरणांची पातळी झपाट्याने खाली येते. त्यामुळे गाव, वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु होते. उन्हाळा सुरु झाला की कोकणातील पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करते. ही समस्या दरवर्षी असते.
मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाईमुळे कोकणातील शेकडो गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. येथील जलव्यवस्थापनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे ही समस्या कोकणवासियांच्या पाचवीला पुजलेली आहे, असे दिसते. कोकणात राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारित मोठी, मध्यम आणि लहान अशी तीन प्रकारची एकूण 173 धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता 3 हजार 867.68 दशलक्ष घनमीटर आहे. जलसंपदा विभागाने 31 मे 2026 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मोठ्या 11 धरणांमध्ये 846.8 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
धरणांची पाणी पातळी
धामणी - 28.57, कवडास व.ब.- 44.38, मध्य वैतरणा - 22.65, डोलवहाळ बं.- 94.46, सिंधुदुर्ग ः तिल्लारी - 30.55, ठाणे ः बारवी- 30.64, भातसा- 35.58, निम्न चोंडे- 57.14, मोडकसागर- 51.46, तानसा- 25.47, ऊर्ध्व घाटघर- 46.50.
