| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे. जलजीवन योजनेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नळपाणी योजना यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाण्याची टंचाई वाढली आहे. दरम्यान कर्जत तालुक्यात आता चार गावे आणि सात आदिवासी वाड्या यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून पाच टँकर यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.
कर्जत तालुक्यात 2021 मध्ये मंजूर असलेल्या जलजीवन मिशन मधील बहुतांश नळपाणी योजना बंद अवस्थेत आहेत. तालुक्यात 121 नळपाणी योजना जलजीवन मिशनमधून मंजूर होत्या. त्यातील 33 नळपाणी योजना कार्यान्वित झाल्या होत्या. तर अन्य योजना निधी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या नळपाणी योजना यांचे पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अर्ध्या भागात नळपाणी योजना अभावी पाण्याची टंचाई वाढली आहे. कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या पोश्री आणि चिल्हार या दोन्ही नद्या आणि त्यांच्या उपनद्या साध्या कोरड्या ठाक आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात असून 39 वाड्या आणि 22 गावे पाणीटंचाई ग्रस्त आहेत. या सर्व ठिकाणी मागणीनुसार मार्च पासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे नियोजन पाणीटंचाई कृती आराखड्यात करण्यात आले आहे.
मात्र, कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एप्रिल महिन्यात शासकीय टँकर सुरू करण्यात आले. तालुक्यात चार गावे आणि सात आदिवासी वाड्या यांना टँकरमधून पाणी पोहचवले जात आहे. त्यासाठी 14 हजार लिटर क्षमता असलेले टँकरची मदत घेतली जात आहे. त्या टँकरच्या माध्यमातून पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या यांची तहान भागवली जात आहे. सध्या उमरोली ग्रामपंचायत मधील आशाणे आणि कोशाने या गावाबरोबर याच ग्रामपंचायत मधील कोशाने ठाकूर वाडी तर किरवली ग्रामपंचायत मधील सावरगाव ठाकूर वाडी आणि किरवली ठाकूर वाडीमध्ये टँकरने पाणी पोहचत होते.
आता त्यात भर पडली असून पळसदरी, ओलमन ग्रामपंचायत मधील झुगरेवाडी या दोन गावांनादेखील टँकर सुरू करण्यात आले आहेत. तर पळसदरी ग्रामपंचायतमधील वर्णे ठाकूरवाडी, खांडस ग्रामपंचायतमधील जांभूळवाडी, नांदगाव ग्रामपंचायतमधील चिमटेवाडी आणि कळंब ग्रामपंचायतमधील बोरीची वाडी अशा सात आदिवासी वाड्यांमध्ये शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
कर्जतमधील पाणी टंचाई वाढली
