सध्या खासगी टँकर ने पाणी पुरवठा
| नेरळ | वृत्तसंस्था |
कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आषाणे ठाकूरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या या वाडीमध्ये खासगी टँकरचे माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्या मधील आषाणे ठाकूरवाडी ही उमरोली ग्रामपंचायतमध्ये आहे. मात्र, आषाणे ठाकूरवाडी डोंगरावर वसली असल्याने स्थानिक ग्रामस्थांना उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या वाडीमध्ये 600 आदिवासी लोकांची वस्ती असून त्यांच्यासाठी असलेल्या दोन्ही विहिरी आटल्या आहेत. त्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी उमरोली ग्रामपंचायत कार्यालयात जावून टँकर सुरू करण्याची मागणी केली. याच वाडी मधील रहिवाशी असलेल्या ठमी सांबरी या उमरोली ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. मात्र, आज त्यांच्याच वाडी मध्ये पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे उमरोली ग्रामपंचायत सरपंच ठमीबाई नामदेव सांबरी, मनोहर ठाणगे, तुकाराम हिरू पिरकर, पदु गणू संबरी, प्रकाश पीरकर सदस्य राजू पिरकर, मंगल लोते, गणपत सांबरी, भाऊ होले, चंद्रकांत पिरकर, महादू पिरकर, वामन पाचंगे, वामन पारधी, विकास निरगुडा यांनी आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेवून पाण्याच्या समस्येबद्दल माहिती दिली. या सर्व ग्रामस्थांनी जेष्ठ कार्यकर्ते शरद ठाणगे यांच्यासोबत आमदार थोरवे यांची भेट घेतल्यावर आमदार थोरवे यांनी कर्जत पंचायत समितीकडे सबंधित वाडीची सध्याची स्थिती जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मात्र, स्थानिक ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबावी यासाठी खासगी टँकर सुरू करण्याचा निर्णय मनोहर थोरवे यांनी घेतला. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ कर्जत येथून पाण्याचा टँकर घेवून शरद ठाणगे हे आषाणे ठाकूर वाडीत पोहचले. टँकर मधून आणण्यात आलेले पाणी तेथील विहिरीमध्ये टाकण्यात आले. आज सकाळी आदिवासी ग्रामस्थांनी विहिरी मधून पिण्याचे पाणी भरले आणि अनेक दिवसांनी मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळाले आहे. आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन कडून माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे, युवा सेना विधानसभा अधिकारी प्रसाद थोरवे, कर्जत शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली व उमरोली जिल्हा परिषद उपतालुकाप्रमुख शरद ठाणगे यांनी आषाणे ठाकूर वाडीत दररोज पाण्याचा टँकर पोहचला जाईल असे आश्वासन आदिवासी ग्रामस्थांना दिले आहे.