। मुंबई । वृतसंस्था ।
भारतातून ९ मार्च रोजी चुकून एक मिसाइल सुटलं आणि ते पाकिस्तानात जाऊन पडलं होतं. या प्रकारानंतर भारताने खेद व्यक्त केला होता. तर, पाकिस्तानी लष्कराने याप्रकरणी एक पत्रकार परिषद घेत भारतीय मिसाईल पाकिस्तानात पडल्याने काही भागात नुकसान झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
“भारतीय मिसाइल आमच्या हद्दीत पडल्यानंतर पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देऊ शकला असता, पण आम्ही संयम दाखवला,” असे इम्रान खान म्हणाले. ही मिसाइल लाहोरपासून २७५ किमी अंतरावर असलेल्या मियाँ चन्नूजवळील शीतगृहावर आदळण्यापूर्वी अनेक विमान कंपन्यांना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, मिसाइल पडल्यामुळे पाकिस्तानमध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.
दरम्यान, ही मिसाइल पडल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने शनिवारी सांगितले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मिसाइल कोसळल्यानंतर भारताकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर ते समाधानी नाहीत आणि त्यांनी संयुक्त चौकशीची मागणी केली. मिसाइल पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याने नेमक्या कारणांची पुष्टी करण्यासाठी पाकिस्तानने या घटनेची संयुक्त चौकशी करण्याचा प्रस्ताव नवी दिल्लीला दिला आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने सांगितले होते.
भारतीय संरक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण-
भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ९ मार्च २०२२ रोजी नेहमीच्या देखभाल प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल अपघाताने प्रक्षेपित झालं. भारत सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या भागात हे मिसाईल पडलं आहे. ही दुर्घटना अत्यंत खेदजनक असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली ही दिलासादायक बाब आहे.