शिमरॉन हेटमायरला दोनवेळा जीवदान; वादळी खेळीने गाजवली क्रिकेटची पंढरी
| मुंबई | प्रतिनिधी |
टी-20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या झिम्बाब्वेला सुपर-8च्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून मोठा पराभव पत्करावा लागला. सोमवारी (दि.23) पार पडलेल्या या सामन्यात शिमरॉन हेटमायरला दोनवेळा जीवदान भेटले. या संधीचा फायदा घेत त्याने क्रिकेटची पंढरी असलेले मुंबईतील वानखेडे स्टेडियम गाजवले. यावेळी वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा तब्बल 107 धावांनी पराभव केला असून वानखेडे स्टेडियमवरील हा त्यांचा टी-20 विश्वचषकातील सलग 5 वा विजय ठरला आहे.
झिम्बाब्वेचा कर्णधार सिंकदर रजाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजचा पहिलाच गडी तिसऱ्या षटकात बाद झाला. ब्रेंडन किंग 9 धावा करत बाद झाला. त्यामुळे झिम्बाब्वेने गोलंदाजीत चांगली सुरूवात केली. त्यानंतर शिमरन हेटमायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो 9 धावांवरच असताना ताशिंगा मुसेकिवा याने हेटमायरची कॅच सोडली. तेव्हा वेस्ट इंडिजने केवळ 26 धावा केल्या होत्या. त्यानंतर शिमरॉन हेटमायरने मिळालेल्या संधीचा चांगलाच फायदा उचलला. त्याने 19 चेंडूतच 50 धावा ठोकल्या. त्यामुळे त्या टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजकडून सर्वात जलद धावा ठरल्या. त्यानंतर पुन्हा एकदा मुसेकिवाने हेटमायरचा झेल सोडला. त्यावेळी हेटमायर 70 धावांवर होता. हेटमायरने 34 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकार मारत 85 धावा केल्या. तसेच, रोवमन पॉवेलने 35 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेसमोर 20 षटकात 6 बाद 254 धावांचे मोठे लक्ष ठेवता आले. झिम्बाब्वेकडून रिचर्ड एनगारावा आणि ब्लेसिंग मुझराबनी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या झिम्बाब्वेचा डाव 17.4 षटकात सर्वबाद 147 धावसंख्येवरच संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इवान्सने 21 चेंडूत 43 धावा केल्या. परंतु, बाकी कोणाला खास काही करता आले नाही. तरी झिम्बाब्वेने 103 धावांवरच 9 गडी गमावले होते. मात्र, शेवटच्या बळीसाठी रिचर्ड एनगारा आणि ब्रॅड इवान्स यांच्यात 19 चेंडूत 44 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे झिम्बाब्वेला 147 धावांपर्यंत पोहोचता आले. जर हेटमारयचा तो कॅच पकडला असता तर सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. आता झिम्बाब्वेचा पुढील सामना गुरूवारी (दि.26) भारताविरुद्ध आहे. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सुपर-8चे सामने गमावल्याने हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात ते असतील. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.
सलग पाच विजयांचा विक्रम
वेस्ट इंडिजने आत्तापर्यंत 2016 ते 2026 या दरम्यान टी-20 विश्वचषकामध्ये वानखेडेवर 5 सामने खेळले आहेत. या पाचही सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. म्हणजेच त्यांची या मैदानावरची विजयाची टक्केवारी 100 टक्के आहे. वानखेडेवर असा विक्रम कोणालाच करता आलेला नाही. इंग्लंडने येथे टी-20 विश्वचषकात 4 सामने खेळले आहेत. परंतु, त्यांना दोनच सामने जिंकले आहेत. भारताने या स्टेडियमवर टी-20 विश्वचषकात केवळ 2 सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे, तर एक पराभूत झाला आहे. पराभूत झालेला सामन्यातही वेस्ट इंडिजविरुद्ध 2016चा टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झाला होता.
