। सायली पाटील । अलिबाग ।
प्रेमात जागा, वेळ, काळ हे काहीच ठरलेलं नसतं. मुळात, ठरवून झालं असतं तर ते प्रेम कसलं? अचानकपणे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जाते. प्रेमाच्या या वेगवेगळ्या वाटांवर…
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं,
आणि खरं असेल तर तुमचं-आमचं सगळ्यांचच सेम असतं.
अगदी या ओळींप्रमाणेच अतिशय साध्या पद्धतीने प्रेमात पडलेल्या पाटील दाम्पत्याची ही प्रेमकहाणी. पुण्यात शिक्षणासाठी गेलेल्या प्रसाद पाटील आणि सुजाता पाटील यांच्या प्रेमाची सुरूवात मैत्रीतून झाली. मैत्रीतून सुरू झालेल्या प्रेमाची बातच काही और असते. सुजाता सहस्त्रबुद्धे या त्यांच्या मैत्रिणींसोबत विद्यार्थी सहय्यक समिती लेडीज हॉस्टेलमध्ये राहात होत्या. आणि, एकाच कॉलेजात असल्यामुळे प्रसाद पाटील आणि सुजाता पाटील यांची चांगली मैत्री झाली होती. आणि, याच मैत्रीतून सुरू झाला त्या दोघांच्या प्रेमाचा प्रवास.
दोघांनाही सामाजिक विषय, साहित्य, कविता, वाचन यांची आवड असल्याने जन्मपत्रिकेतले 36 चे 36 गुण जुळावे अगदी तसेच दोघांचे विचार व आवडीनिवडी जुळून आल्या होत्या. 1988 ते 1990 पर्यंत सुरू असलेल्या भेटीगाठी, पत्रांमधून व्यक्त होणार्या या प्रेमाचे रुपांतर 8 जून 1990 ला लग्नात झाले. पण, महत्त्वाचे म्हणजे, प्रेम म्हटलं की नुसत्या गप्पा, मजामौज, फिरणं इतकंच नसतं. तर, प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणे, विचारांची जुळवाजुळव, सामंजस्य, आदर या सगळ्या गोष्टी आल्या. आणि, या सगळ्याची समज असणार्या या दाम्पत्याने आपल्या लग्नात घरच्यांना कोणताच खर्च न देता आपण आपल्याला जमेल तसं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने कर्णिक हॉल, अलिबाग येथे रजिस्टर पद्धतीने लग्न केले. आणि, 31 वर्षांनंतरही त्यांच्या प्रेमाचा आंबट-गोड असा हा प्रवास अगदी सुखाचा सुरू आहे.
सामंजस्य नसल्यामुळे अनेक लग्न मोडतात. त्यामुळे सामंजस्य, विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. तो आधी घट्ट करणे महत्त्वाचे आहे. – अॅड. प्रसाद पाटील
लग्नातील विधींवर खर्च करण्यापेक्षा जास्त विचार हा सहजीवनावर होणे अपेक्षित असते. परंतु, हेच कुठेतरी हरवताना दिसत आहे. – सुजाता पाटील