भात खार्या पाण्यात भिजल्याने उपासमारीची वेळ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आधी अवकाळी पावसाने झोडले, त्यानंतर उधाणाच पाण्याने संरक्षक बंधारे फुटून खारे पाणी शेतात घुसल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील खारेपाटातील शहापूर व धेरंड गावातील शेतकर्यांना याचा मोठा फटका बसला असून, कापून ठेवलेले भात तसेच मळणी करुन पोत्यात भरलेले भात भिजल्याने शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, 1 व 2 डिसेंबर रोजीच्या अवकाळी पावसात व त्यानंतर संरक्षक बंधारा फुटून घुसलेल्या खार्यापाण्याने भातपिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी केवळ शेतरस्ते नसल्याने शेतकर्यांना आपापल्या घरी आणता आले नाही. भात लागवडीखालील 4596 हेक्टर क्षेत्रातील 50 टक्के भात नुकसानी गृहित धरली तरी 1 लाख 19 हजार क्विंटल भाताचे नुकसान झाले असल्याची माहिती शहापूरमधील अभ्यासू शेतकरी तथा निवृत्त शिक्षक विनायक पाटील यांनी दिली आहे. संरक्षक बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी खारभूमी खाते पैसे उपलब्ध करुन देत नसल्याने शेतकर्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. तर एमआयडीसीनेदेखील शेतरस्ते बांधून देण्याची गरज आहे. मात्र, दोन्ही खाते आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याऐवजी काही करत नसल्याने झालेल्या शेतकर्यांच्या या नुकसानीला खारभूमीबरोबरच एमआयडीसी आणि पर्यायाने शासनच जबाबदार असल्याने नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, खारेपाटातील लागवडीखालील भातशेती क्षेत्राची भात उत्पादकता प्रतिहेक्टर 52 क्विंटल आहे. यंदा 4596 हेक्टर क्षेत्रात भातशेती करण्यात आली होती. उत्पादकतादेखील चांगली होती. नैसर्गिक आपत्ती वा संरक्षक बंधारे फुटून खारेपाणी शेतात घुसले नसते, त्याचबरोबर शेतरस्ते असते तर एकरी 52 क्विंटल याप्रमाणे एकूण 2 लाख 39 हजार क्विंटल भात मिळाले असते. परंतु, या आपत्तींमुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक भाताचे नुकसान झाले. जरी 50 टक्के गृहीत धरले तरी 1 लाख 18 हजार क्विंटल भाताचे पूर्णपणे नुकसान झाले असल्याचे गणित धाकटे शहापूर येथील शेतकरी सुधीर पाटील यांनी सांगितले. खारेपाटातील शेतीतील अतिरिक्त क्षार वाहून नेण्यासाठी पूर्वजांनी प्रत्येक 25 शेतांना धरून पाणी वाहून नेण्याचे मार्ग 300 वर्षांहून जास्त काळ अस्तित्वात आहेत. यांना चिरणी आणि टाशी असे म्हणतात. सरकारी दप्तरी याला नाला असे म्हटले जाते. टाशीच्या कडेला किमान 15 फूट जागा सोडून शेती असते. ही जागा व बांध पूर्ण दलदलीचे व चिखल मातीचे असतात. ही जागा पूर्णपणे सार्वजनिक वहिवाटीची असते. या जागेचा वापर करून टाशीच्या कडेला शेतरस्ते किवा पाणंद रस्ते करावेत, असा प्रस्ताव संपूर्ण कोकणासाठी श्रमिक मुक्ती दल शेतकरी संघटनेने राज्य शासनास दिला होता, अशी माहिती श्रमिक मुक्तीदलाचे नंदन पाटील यांनी दिली.
पीक हातात आल्यावर दरवर्षी अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण वाढत चालेल आहे. त्यामुळे भाताचे भारे भिजून त्याला मोड येतात, तर उडवी भिजून संपूर्ण पिकास मोड येतात आणि काही ठिकाणी 50 टक्के तर काही ठिकाणी पूर्ण नुकसान होते. याला कंटाळून काही शेतकरी जमिनी विकू पाहात असल्याचेही पाटील यांनी पुढे सांगितले. शेतीमध्ये मशीनचा वापर करायचा तर ती मशीन शेतापर्यंत पोचवता येत नाही. भाताची वाहतुक करायची तर वाहन शेतीपर्यंत पोचू शकत नाही. आम्ही भारे घरी आणून सावकाश मळणी काढू शकतो व 100 टक्के पिक उत्पादन मिळवू शकतो पण ते आणण्यासाठी आम्हाला शेतापर्यंत वाहन नेता येत नाही.आणि तलावातील मासे देखील जिवंत बाजारात जाऊ शकत नाही. कारण टाशीच्या कडेने शासनांनी पोहोच रस्ते बनवलेले नाहीत, अशी खंत सुधीर पाटील यांनी व्यक्त केली.
खारभूमी विभागाची अकार्यक्षमता
राज्याच्या कृषी विभागाच्याच अहवालानुसार, अलिबाग तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 49 हजार 901 हेक्टर आहे. त्यातील भातपिकाखाली 17 हजार 200 हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यातील खारभूमी क्षेत्र 7616 हेक्टर आहे. तर, या खारभूमी क्षेत्रातील भातपिकाखालील क्षेत्र 4091 हेक्टर आहे. खारभूमी विभागाने गेल्या तीस वर्षांत समुद्र संरक्षक बंधार्याची देखभाल दुरुस्ती केली नसल्याने ते फुटून समुद्राचे खारेपाणी 3016 हेक्टर भातशेती क्षेत्रात घुसून त्या ठिकाणी खारफुटी वनस्पतींची नैसर्गिक निर्मिती झाल्याने हे भातशेती क्षेत्र कायमस्वरुपी नष्ट झाले आहे.
- तहसीलदार मीनल दळवी यांनी पुढाकार घेऊन अलिबाग गटविकास अधिकारी, उपभियंता खारभूमी व श्रमिक मुक्ती दल यांच्यासमवेत गेल्या 30 नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन शहापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत अडीच कि.मी. लांबीचे टाशीच्या कडेने दोन पोहोच रस्ते बनवण्याचे निर्देश दिले आहेत. – राजन भगत, संघटक श्रमिक मुक्ती दल, रायगड