। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दिवाळीच्या फराळ देण्यासाठी शासनाने मोठया प्रमाणावर खर्च केला. मात्र आज दिवाळी संपूर्ण तुळशी विवाहाला सुरुवात होईल. तरी देखील आधि तेल आले, त्यानंतर आता रवा मैदा आला. जनतेने दिवाळी कशी करावी. राज्य शासनाने ही योजना नक्की कोणासाठी वापरली? ठेकेदारासाठी की जनतेसाठी वापरली असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे. आता शिधेचे काय करायचे असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे पुरवठा विभाग आणि शासनाने आनंदाचा शिधा प्रत्यक्ष किती आला याची महिती द्यावी अशी मागणीही पंडित पाटील यांनी केली आहे. कामचुकार ठेकेदाराला दिवाळीपुर्वी देता आले नाही. आता काही दिवसांनी देव दिवाळी येईल? पुरवठा विभागातील काही अधिकारी कर्मचारी अजून सुट्टी संपवून परतले नसल्याने पंडित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्य शासनाने दिवाळीमध्ये जनतेसाठी आनंदाचा शिधा या नावाने फराळासाठी लागणारे जिन्नस शंभर रुपयात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभरात चांगले स्वागत देखील झाले. मात्र प्रत्यक्षात हा शिधा गोदामात आणि रेशनिंग दुकानावर येईपर्यंत दिवाळी सुरु देखील झाली होती. त्यामुळे या शिधाचा फारसा उपयोग दिवाळीमध्ये जनतेला झालाच नाही. त्यात कुठे तेल उशिरा आले. तर कुठे डाळ आलीच नाही. साखर कमी आली तर रवा आलाच नाही असे प्रकार समोर आले. त्यामुळे जनतेला एकत्रित असा शिधा उपलब्ध झालाच नाही. त्यात हा शिधा ज्या पिशवीतून वाटप करण्यात येणार होता त्या पिशव्याच अनेक ठिकाणी पोहचल्या नाहीत तर कुठे कमी प्रमाणात पोहचल्या. त्यामुळे ती अडचण देखील आल्याने शिधा घरापर्यंत पोहचायला उशिर झाला. आतापर्यंत जवळ जवळ 75 टक्के पात्र रेशनधारकांपर्यंत हा शिधा पोहचला असला तरी सुमारे 25 टक्के लाभार्थी अजूनही वंचितच राहिले आहेत.
आज दिनांक 3 नोव्हेंबर पर्यंत स्थिती पुढीलप्रमाणे
जिल्ह्याची एकूण कार्ड संख्या 4,48,075, अंत्योदय शिधापत्रिका 83,251, धान्य कुटुंब शिधापत्रिका 3,64,824.
जिल्ह्यात आज रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या शिधाजींनस पामतेल 4,47,959 लिटर, साखर 4,33,046 किलोग्रॅम रवा 3,81,480 किलोग्रॅम, चणाडाळ 3,79,272 किलोग्रॅम, फेस्टिवल बॅग 2,16,250. तर रायगड जिल्ह्याला एकूण प्राप्त झालेल्या शिधा जिन्नस ची संख्या 3,79,272.
आजपर्यंत एकूण झालेले वितरणानुसार अंत्योदय शिधापत्रिका 64,935, तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका 2,69,969. एकूण वाटप झालेले शिधापत्रिकाधारक 3,34,904 इतके आहेत.
रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण 33,395 शिधापत्रिकांना ऑनलाइन आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. 3,00,909 ऑफलाइन वाटप केलेल्या शिधापत्रिका.
अजूनही रायगड जिल्ह्यामध्ये 68 हजार 803 इतके कीट उपलब्ध झालेले नाहीत. सदर किट उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांना शिधा वाटप केले जाणार आहे.