। पेण। प्रतिनिधी।
पेण विश्वेश्वर स्मशानभूमीचे स्मशानभूमीचे नुतनीकरण होत असेल तर जागा बदलावी, अशी मागणी शेकाप नगरसेवक संतोष पाटील यांनी नपा प्रशासनाकडे केली आहे.
या स्मशानभूमी नुतनीकरणाचा प्रस्ताव गेली दोन ते तीन वर्ष लाल फितीतच अडकलेले असताना वेळोवेळी सभागृहात स्मशानभूमीची जागा बदलावी यासाठी शेकापचे नगरसेवक शोमेर पेणकर, संतोष पाटील यांनी पाठपुरावा केला होता. परंतु निधीचे कारण सांगून वेळोवेळी चालढकलपणा करण्यात आला आहे. याबाबत स्मशानभूमीचे नुतनीकरण बाबत नगरसेवक संतोष पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून स्मशानभूमीची जागा बदलण्याबाबत नगरपालिकेशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले.
दोन दिवसापूर्वी पालिका प्रशासक जीवन पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, पेण शहरातील विश्वेश्वर स्मशानभूमीचे नुतनीकरण करण्यासाठी 5 कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे. महत्वाची बाब म्हणजे विश्वेश्वर स्मशानभूमी ही 4 दशके जुनी असून ज्या वेळेला या स्मशानभूमीचे काम केले. त्या वेळेला पेण शहराची लोकसंख्या कमी होती. तसेच या स्मशानभूमीचे बांधकाम होताना भविष्याचे नियोजन, शहरातील जनतेच्या आरोग्याचा विचार केला नाही. जर तत्कालीन राज्यकर्त्यांनी योग्य प्रकारे विचार केला असता तर विश्वेश्वर स्मशानभूमी ही आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नक्कीच नसती. कारण पेण शहराला जो पाणी पुरवठा केला जातो. तो भोगावती नदीच्या पिंपळ डोहातून आणि विश्वेश्वर स्मशानभूमी आहे ती भोगावती नदीच्या तीरावर स्मशानभूमी ही नदीवरील धरणाच्या वरच्या अंगाला असल्यामुळे अंत्यविधी नंतर मोठ्या प्रमाणात राख, अस्थि, या नदीच्या पाण्यात सोडल्या जातात. त्यामुळे कळत-नकळत पाणी दूषित होते. असे संतोष पाटील यांनी निदर्शनास आणले आहे.
त्यातच पेण शहरासाठी असणारे दोन जलशुद्धीकरण केंद्र हे दोघे मिळून साडे अकरा एम.एल.टी. पाणी शुध्द करू शकतात. मात्र, पेण शहराला सध्या 16 ते 17 एम.एल.टी पाण्याची गरज आहे. याचाच अर्थ पेणकरांना शुध्द पाणी उपलब्ध होत नाही. त्यातच जर स्मशानभूमीतून राख व अस्थि पाण्यात मिसळत असतील तर पाणी प्रदूषित झाल्याशिवाय राहणार नाही. ही बाब टाळायची असेल तर स्मशानभूमीचे नूतनीकरण करत असताना स्मशानभूमी ही स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. असे मत प्रसार माध्यमांसमोर पाटील यांनी मांडले.
पुढे त्यांनी सांगितले की, भोगावती नदीचे पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या धरणाच्या खालच्या बाजूस पेण नगरपालिकेची आरक्षित जागा आहे. त्या ठिकाणी नव्याने स्मशानभूमीचे बांधकाम केल्यास नक्कीच ते पेणच्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल.
तसेच सध्या असणार्या विश्वेश्वर स्मशानभूमीचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी दशक्रीया विधी, उत्तर कार्य यासाठी व्यवस्था करावी. जेणे करून पेणकरांच्या दृष्टीने भविष्यात नाशिक, हरिहरेश्वर, उद्धरेश्वर या ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही.
शेवटी त्यांनी असे सांगितले की पेणकरांच्या आरोग्याचा, भविष्याचा विचार करून स्मशानभूमी स्थलांतरीत करावी. यासाठी पेण नगरपालिके बरोबर पत्रव्यवहार केला असून नगरविकास मंत्रालया बरोबर पत्रव्यवहार करणार आहे. व या कामासाठी माजी आ. धैर्यशिल पाटील यांची देखील मदत घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.