तिचा आत्महत्येचा प्रयत्न नाही
| महाड | प्रतिनिधी |
जन्मदात्या आईनेच पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून मारण्याच्या प्रकाराला आता वेगळेच वळण लागले आहे. या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता, असे आता पोलीस तपासात उघड झाले आहे. महिलेची हालचाल संशयास्पद वाटल्याने विहीर मालकाने घटनास्थळी तपास केला असता तिचे कौर्य उघड पडले. पोलीस या घटनेने बुचकळ्यात पडले असून, तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याविषयी गूढ वाढले आहे. या महिलेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील बिरवाडीजवळील खरवली गावाच्या हद्दीत रुना चिखरु साहनी (30) या महिलेने आपल्या मुलांना विहिरीत ढकलून दिले. सोमवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. परिसरात सुरु असलेल्या प्राथमिक चर्चेतून महागाई, कौटुंबिक कलह, क्षणाचा राग अशी विविध कारणे समोर येत आहेत.
या घटनेने सारा रायगड जिल्हा हादरून गेला. मंगळवारी या सहाही बालकांवर खरवली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत जिल्ह्यातील तपास यंत्रणा कामाला लागली आहे. मंगळवारी सकाळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनीदेखील घटनास्थळी पाहणी केली.
मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले हे कुटुंब महाड औद्योगिक परिसरात शेलटोली गावात राहात होते. वर्षभरापूर्वी हे कुटुंब शेलटोली येथे राहण्यास गेले होते. मात्र, यापूर्वी हे कुटुंब खरवली येथे राहात होते. ज्या विहिरीत या मुलांना ढकलून दिले तिथपासून शेलटोली हे गावाचे अंतर जवळपास सहा कि.मी.वर आहे. मात्र, खरवली गावात राहिल्याने विहीर आणि परिसराचा अंदाज या महिलेला असावा, यामुळे या महिलेने पूर्वी राहसत असलेल्या खरवली गावातील या विहिरीवर मुलांना घेऊन आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, इतक्या लांब भरदुपारच्या सुमारास ती महिला मुलांना घेऊन कशी गेली असेल, याविषयी बोलले जात आहे.
विहिरीच्या मालकाने या महिलेला पहिल्याने हा प्रकार उघड झाला आहे. यामुळे विहीर मालकाची फिर्यादी म्हणून नोंद पोलिसांनी घेतली आहे. एक वर्षापूर्वी हे कुटुंब खरवली ढालकाठी येथे राहात होते, असे विहीर मालक महादेव शिर्के यांनी सांगितले. सहा मुलांना एक महिला विहिरीत कशी काय ढकलून देऊ शकेल? हे कृत्य करीत असताना तिच्याबरोबर अजून कोणी होते का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात. एका मुलाला ढकलून दिल्यानंतर अन्य मुले का पळाली नाहीत? अशा अनेक प्रश्नांची उकल होणे गरजेचे आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरत गोगावले हे देखील तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. या विहिरीमध्ये शिडी टाकून लहान मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यासाठी ग्रामस्थ व महाडमधील साळुखे रेस्क्यु टीमने सहकार्य केले.
महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यांमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून, महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. आंधळे हे करीत आहेत.
मृत मुलांची नावे
रेश्मा चिखरु साहनी, करिश्मा, रोशनी, विद्या, राधा व शिवराज अशी या मृत झालेल्या मुलांची नावे असून, त्यांची वये दीड ते दहा वर्षापर्यंत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेचा पती चिखरु साहनी व रुना साहनी यांना ताब्यात घेतले आहे.