सामना रद्द झाल्यामुळे मिळाले शुभ संकेत
। फ्लोरिडा। वृत्तसंस्था।
भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हा सामना रद्द होणे म्हणजे शुभसंकेत मानला जात आहे. कारण, 2007 च्या टी-20 विश्वचषकात भारत आणि स्कॉटलँडचा सामना रद्द झाला होती. त्या विश्वचषकात भारताने विजेतेपद पटकावले होते. भारतीय क्रिकेट चाहत्यांना 17 वर्षांपूर्वी ज्या प्रमाणे भारताने विजेतेपद पटकावले होते तशीच कामगिरी पुन्हा व्हावी, अशी अपेक्षा आहे.
भारतीय संघाने 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. भारताची त्या विश्वचषकात पहिला सामना स्कॉटलँड विरुद्ध होणार होता. मात्र, पावसामुळे तो रद्द करावा लागला होता. भारताने यानंतर दमदार कामगिरी करत टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्या वेळी भारताने पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज संघांना पराभूत केले होते.
आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपणार? भारताने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या लढतीत पाकिस्तानला पराभूत केले होते. 2011 मध्ये झालेल्या एकदिसीय विश्वचषकात देखील भारताने अंतिम फेरीच्या लढतीत श्रीलंकेला पराभूत केले होते. भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर टी-20 किंवा एकदिवसीय विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवता आलेले नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. भारताला 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. रोहित शर्माच्या नेतृ्त्त्वात भारत आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहावे लागणार आहे.