समाजक्रांती आघाडीचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रशिक्षणानंतर अधिपरिचारीकांना नियुक्ती ने देण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात समाजक्रांती आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अधिपरिचारीकांना नियुक्ती न दिल्यास धरणे आणि त्यानंतर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समाज क्रांती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष बी जी पाटील यांनी दिला आहे. अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. यावेळी समाजक्रांती आघाडीच्या पदाधिकार्यांसह अधिपरिचारीकां तसेच पालक उपस्थित होते. प्रशिक्षण सुरु असतानाही कोरोना काळात रुग्ण सेवा करणार्या जिल्ह्यातील 15 अधिपरिचारीकांना प्रशिक्षण पूर्ण होऊन 12 हून अधिक महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यांना अजूनही 18 महिन्यांची नियुक्ती मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना 18 महिन्यांचे नियुक्तीचे आदेश देण्याची मागणी करत हल्लाबोल धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत शासनाला देण्यात आलेल्या निवेदना म्हटले आहे की, अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात करुन 2019-20 मध्ये आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केले. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या बंधपात्र अधिपरिचारीका यांना संबंधीत आरोग्य अधिकारी व कार्यालय येथे वारंवार भेट देऊन अर्ज विनंत्या करुन सुद्धा नियमाप्रमाणे 18 महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळत नाहीत. जिल्ह्याच्या मेरिटलिस्टमध्ये येऊन सदर प्रशिक्षणासाठी आमची निवड झाली आहे. मेहनत घेऊन अभ्यास करुन आम्ही उत्तीर्ण झालो आहेत. परंतु आज आम्ही बेरोजगार आहोत. प्रशिक्षण चालु असताना सुद्धा कोरोना महामारीच्या आपत्तीत देखील आम्ही रुग्णसेवेचे काम केले आहे. मात्रा आता नियुक्ती मिळत नसल्याने आम्ही आर्थिक व मानसिक तणावात आहोत. त्यामुळे नाईलाजाने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 फेब्रुवारी पासून हल्ला बोल धरणे आंदोलन करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे आम्च्या मागण्या शासनाने त्वरीत पुर्ण करुन सदर आंदोलनाची वेळ आणू नये असे आवाहन या परिचारीकांनी केले आहे.