। पुणे । प्रतिनिधी ।
शिरूर लोकसभा मतदार संघासाठी चुरशीने मतदान झाल्यानंतर कुणाची सरशी होणार आणि कोण तोंडघशी पडणार याबाबत, आपापले मुद्दे प्रभावीपणे मांडून आडाखे बांधले जात आहेत. मतदार हुशार असल्याने भल्याभल्यांचे अंदाज चुकणार असून, ‘घड्याळ चालणार की तुतारी वाजणार’ अशा चर्चांनी जोर धरला आहे.
शिरूर मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील या आजी-माजी खासदारांत प्रत्यक्षात काँटे की टक्कर झाली असली तरी ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदार संघात पारंपारिक लढतीत प्रचारापासून सुरू झालेली चुरस मतदानापर्यंत कायम राहिली. उमेदवारी, प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानातील चुरशीमुळे विजयाचा कौल कुणाला मिळणार, याचा अंदाज भल्याभल्यांना येऊ शकलेला नाही. या अनुभवी उमेदवारांत कोण बाजी मारणार, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. दोन्ही बाजूचे उमेदवार, स्थानिक नेते, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या विजयाचा दावा करीत असले तरी राजकीय तज्ज्ञ आणि निवडणुकांतील धुरीण मात्र ठामठोक बोलायला तयार नाहीत. शिरूरसह, आंबेगाव, खेड, जुन्नर हे ग्रामीण तर हडपसर व भोसरी या शहरी भागाचा समावेश असलेल्या या संमिश्र जनभावनेच्या मतदार संघातील निकालाचा अंदाज बांधणे बहुतेकांना कठीण जात आहे.