। नवीन पनवेल । वार्ताहर ।
बाहेरच्या लोकांशी का बोलतेस असे बोलून चारित्र्यावरती संशय घेऊन आणि पैशाची मागणी करून मानसिक त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांनाही अटक केली असल्याची माहिती वपोनि जितेंद्र सोनावणे यांनी दिली.
शालन यांचे लग्न 2019 मध्ये प्रल्हाद माणिक वाकळे (परभणी) यांच्यासोबत झाले. 2021 मध्ये पती प्रल्हाद, सासू विमल, सासरे माणिक यांनी माहेरून 50 हजार रूपये आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला. यावेळी तिने पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबतची माहिती शालन हिने तिच्या माहेरच्याना दिली. यावेळी माहेरच्यांनी तिला समजावले. त्यानंतर 17 मे रोजी प्रल्हाद यांनी सासरे सोपान निकाळजे यांना फोन करून मुलगी शालन मयत झाली असल्याचे सांगितले. आत्महत्या केल्याप्रकरणी शालन यांचे पती प्रल्हाद वाकळे, सासू विमल वाकळे आणि सासरे माणिक वाकळे यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.