| मुरूड | वृत्तसंस्था |
राहुल गांधीं व सोनिया गांधी देश एकसंध ठेवण्यासाठी काम करीत आहेत. गांधी घराणे त्यागाची मूर्ती आहे. त्याग फक्त काँग्रेसचीच माणसे करू शकतात. तरीही मोदी व भाजप त्यांच्यावर नको ते आरोप करीत आहेत. हे चुकीचे आहे. राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी महाविकास आघाडीच्या अनंत गीते यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. प्रविण ठाकुर यांनी नांदगावमध्ये बोलताना केले.
आगामी 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुड तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या महिलांना आपला संसार चालवितांना भाजपच्या राज्यात अक्षरशः नाकीनऊ येत आहेत म्हणून महिलांचा भाजपावर मोठा राग आहे तो या निवडणुकीत दिसून येणार आहे. आजकाल आपल्या काकांना पुतण्याने फसविण्याची फॅशन आली आहे. हा गेला, तो गेला तरी जनतेला काहीही फरक पडत नाही. सगळी पदे भोगूनही मोठ्या माणसांची पोटे भरत नाहीत हे अनाकलनीय आहे. समाजाला व देशाला गरज असताना पक्ष सोडणे चुकीचे आहे असा टोला त्यांनी मुश्ताक अंतुले यांना लगावला. बॅ. अंतुले हे घरातले नात्यातले असतांना ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जेवढे कळले ते मुश्ताक अंतुलेंना कळलेच नाहीत असा हल्ला करीत रायगड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे समन्वयक राजाभाऊ ठाकुर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगले काम केले तर गीते मोठ्या फरकाने विजयी होतील असा आशावाद व्यक्त केला. देशातल्या व पक्षातील काही नेत्यांना तादळातील खड्यासारखे बाहेर काढून फेकून द्या असे त्यांनी कार्यकर्त्याना आवाहन केले.
यावेळी मुरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष महाडिक, ॲड. इस्माईल घोले, जिल्हा महिला उपाध्यक्षा वासंती उमरोटकर, प्रितम पाटील, ॲड. विनायक शेडगे, शकील कडू, सुधीर दांडेकर, मंजुम अप्पा घोले, आदींनी या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अस्लम हलडे यांनी तर आभार असगर दळवी यांनी मानले. नाना गुरव, शरद काबुकर, कृष्णा अंबाजी, सुदेश वाणी डॉ. इक्बाल हसवारे, तसेच मुरुड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.