राखीव जागेसाठी बौद्ध समाजाच्या महिलांचे उपोषण

न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत प्राणपणाने लढणार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।

अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आम्हाला ज्ञात आहे. त्यामुळे आम्ही अन्याय सहन करणार नसून आम्ही आमच्या न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत प्राणपणाने लढणार असा इशारा निगडे येथील बौद्ध समाजाच्या महिलांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील निगडे हद्दीतील गट नंबर, सर्वे नंबर 48 येथील जवळपास 3 ते 4 एकर गावठाण बेकायदेशीरपणे हडप करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे येथील महिला व ग्रामस्थ आक्रमक झाल्या आहेत. आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी संतप्त ग्रामस्थानी पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले व प्रशासनाला धारेवर धरत नकाशावर महारवाडा अशी नोंद असलेली राखीव जागा बौद्ध समाजाला तत्काळ देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली.
ही जागा बौद्ध समाजाच्या नावावर असल्याचा गावाच्या नकाशात उल्लेख आहे. मात्र, अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेली असल्याने या जागेवर अनेकांनी बेकायदेशीरपणे घरे बांधलेली आहेत. याबाबत वारंवार शासनाकडे उपोषण पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण शासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष देवेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे ग्रामस्थांनी उपोषणास सुरुवात केली आहे. तसेच जागा मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. दरम्यान निगडे ग्रामसेवक विशाखा पेडवी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सदर जागेच्या मोजणीकामी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असून मोजणी नंतर चित्र स्पष्ट होईल, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Exit mobile version