विश्वविजेता होणार कोट्याधीश

करोडोंच्या बक्षिसांचा वर्षावर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. स्पर्धेत करोडोंच्या बक्षिसांचा वर्षाव होणार असून, विश्वविजेत्या संघही कोट्याधीश होणार आहे.

या महास्पर्धेत एकूण 10 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 82 कोटी 95 लाख 82,000 रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव केला जाणार आहे. विजेत्या संघाला यापैकी 4 मिलियन म्हणजेच जवळपास 33.18 कोटी रुपये दिले जाणार आहेत. उपविजेत्याला 2 मिलियन म्हणजेच 16 कोटी दिले जातील. उपांत्य फेरीतील दोन संघांना प्रत्येकी 6 कोटी आणि साखळी फेरीतील संघांना प्रत्येकी 82 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणर आहे. 5 ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या दोन गतविजेत्यांमध्ये सलामीचा सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. श्रीलंका आणि नेदरलँड्स यांनी पात्रता फेरीत अव्वल कामगिरी करून भारताचे तिकीट मिळवले. दोनवेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज प्रथमच या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.

राखीव दिवस फक्त…
भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. ठरलेल्या दिवशी सामना थांबवावा लागला, तर तो पुढच्या दिवशी खेळवला जाईल.
उपांत्यफेरीचं गणित
2019च्या वर्ल्ड कप प्रमाणेच 9 पैकी 7 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरेल. 6 विजयानंतरही संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, परंतु त्याला अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. जर संघांचे गुण समान झाले, तर नेट रन रेटचा विचार केला जाईल आणि त्यानंतर निर्णय होईल. 2019मध्ये न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरस झाली होती. दोन्ही संघांनी समान 5 विजयासह 11 गुणांची कमाई केली होती. त्यांच्या एक सामना अनिर्णीत राहिलेला. अशावेळी नेट रन रेट कामी आला होता. 3 संघांनी सहा विजय मिळवल्या, नेट रन रेटवर निकाल लागेल. अशा परिस्थितीत 7 विजय हे सर्वात सुरक्षित गणित आहे.
Exit mobile version