| मुंबई | प्रतिनिधी |
लोकल प्रवासात हिंदी-मराठी झालेल्या वादातून 19 वर्षीय अर्णव खैरे या विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का?, असे बोलत काही तरुणांनी बेदम मारहाण केली. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली. झालेल्या मारहाणीमुळे अर्णव विद्यार्थी मानसिक तणावात होता. याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याणमध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली. अर्णव खैरे (19) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णवचे वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून, पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, लोकलमधली झुंडशाही, मराठी-हिंदी वाद कोणत्या टोकाला पोहचला हेच या घटनेवरून दिसून येत आहे. पोलिसांनी अर्णवच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अर्णवच्या कुटुंबीयांनी केली आहे.
वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार कल्याण पूर्व तिसगाव नाका येथील सहजीवन रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता. मंगळवारी (दि.18) तो नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजकडे निघाला होता. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने गर्दीत अर्णवने हिंदीत थोडा आगे हो… असे बोलला. इतक्यात आजूबाजूच्या चार ते पाच जणांच्या टोळयांनी तुला मराठी बोलात येत नाही का?, अशी विचारणा करत तूला मराठी बोलण्याची लाज वाटते का?, असे म्हणत त्याला ठोशांनी बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने मुलुंडला गेला. त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले. पण मानसिक तणावामुळे कॉलेज अर्ध्यातून सोडून दुपारी घरी परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून आपली आपबीती व्यक्त केली.
सायंकाळी सातच्या सुमारास वडील घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले. यानंतर अर्णव याच्या वडिलांनी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी जवाब नोंदवला असून, पोलिसांनी नोंद करत वडिलांच्या जबाबानुसार तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या घटनेचा सखोल तपास करून या प्रकरणी मराठी तरुण आहेत की अमराठी याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मनसे नेहमी मराठी माणसाच्या पाठी उभी आहे. जर या घटनेत मराठी माणसं असतील तर त्यांना पाठीशी घातल्या जाणार नाही, असं मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे म्हणाले.






