अन्यायाविरोधात लढण्याची युवकांमध्ये ताकद: सुरेश घरत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही लोकशाहीला न शोभणारी बाब आहे. हा प्रकार निषेधार्ह असून देशातील तरुण आता जागा झाला आहे, असे प्रतिपादन शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले.

ते पुढे म्हणाले, तरुणांच्या आवाजाला दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न उलट त्यांचा निर्धार अधिक मजबूत करेल. विद्यार्थ्यांवर लाठी चालवून प्रश्न संपणार नाहीत. अन्यायाविरोधात लढण्याची आणि परिवर्तन घडवून आणण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यामुळे शेकाप विद्यार्थी आणि तरुणांच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.

संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करणाऱ्यांना देशविरोधी ठरविण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीसाठी धोकादायक आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांनाही अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर हा गंभीर चिंतेचा विषय आहे. अशा प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने उत्तर देण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर आहे, असेही त्यांनी सांगितले.

रायगडमधील आंदोलनाचा उल्लेख करत सुरेश घरत म्हणाले, अलिबागमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली, याचे स्वागत केले पाहिजे. मतभेद असले तरी लोकशाहीत संवाद आणि संयम यालाच महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या प्रत्येक लोकशाहीवादी लढ्यात शेतकरी कामगार पक्ष ठामपणे सहभागी राहील.

Exit mobile version