जि.प.चे 15 पैकी एकाच तालुक्यात समाधानकारक काम
| रायगड | प्रतिनिधी ।
प्लास्टिक कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्याकडून 15 तालुक्यांपैकी 14 तालुक्यांमध्ये कामच सुरु झालेले नाही. तर दुसरीकडे सामाजिक संस्थांनी हाती घेतलेल्या कामामध्ये प्रगती असल्याचे दिसून येते.
प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत, सामाजिक संस्था यांच्या साहाय्याने प्रत्येक तालुक्यात एक प्लास्टिक संकलन केंद्र निर्माण करण्यात येत आहे. तीन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 15 ग्रामपंचायतींची निवड प्लास्टिक संकलनासाठी जिल्हा परिषदेने केली होती. या केंद्रांमध्ये जमा करण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर पूर्णप्रक्रिया करण्यात येणार असल्याचे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी मोठा गाजावाजा करुन जाहीर केले होते. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक काम झाल्याचे दिसत नाही. पनवेल तालुक्यातील पाली देवत या ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक कचरा संकलन केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणच्या कामामध्ये सातत्याचा अभाव असल्याने पूर्ण क्षमतेने संकलन होत नाही. तसेच रोहा तालुक्यातील नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये देखील काम होत नसल्याची खंत पाणी व स्वच्छता विभागाने कृषीवलशी बोलताना व्यक्त केली.
प्रशासनाने सामाजिक संघटनाचे सहकार्य घेतले आहे. मात्र, त्यांच्यावरच सर्व काम सोपवण्यात आल्याचे स्पष्ट होते. मुंबई येथील आम्ही हि संस्था मुरुड तालुक्यातील काशीद, नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये चांगले काम करत आहे. संकलन केला कचरा ते मुंबई-पुणे येथे पुनरप्रक्रियेसाठी पाठवत आहेत. स्वदेश फाऊंडेशन देखील महाड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड तालुक्यात समाधानकारक काम करत आहे. ते माणगाव तालुक्यातील होडगाव येथे कचरा संकलन करुन मुंबई-पुण्यात पाठवत आहेत. त्याचप्रमाणे प्राईड इंडिया महाड हि संस्था देखील महाड, सुधागड तालुक्यात काम करत आहे. ते देखील तेथील कचरा पुणे येथे प्रक्रियेसाठी पाठवत आहेत. तसेच शुंखला या संस्थेचे काम महाड, माणगाव तालुक्यातील काही गावांमध्ये सुरु आहे. ते देखील कचऱ्याचे संकलन करुन मुंबई, पुण्यात प्रक्रियेसाठी पाठवत आहे. याचाच अर्थ सामाजिक संघटना चांगले काम करत आहेत, मात्र प्रशासनाकडून समाधानकारक काम सुरु असल्याचे दिसत नाही.
सामाजिक संस्थांवर अवलंबुन रायगड हा ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जात असून जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी गावांमध्ये प्रकल्प उभे राहिल्याने औद्योगिकीकरणदेखील वाढत आहे. मुंबईच्या जवळ असलेल्या जिल्ह्यांतील गावांमध्ये लोकवस्ती वाढू लागली. यामुळे जिल्ह्यात कचऱ्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. या कचऱ्यात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात आहे. प्लास्टिक कचऱ्याची ही समस्या मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकून अगळा वेगळा उपक्रम गाव पातळीवर सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यासाठी ते सामाजिक संस्थांवर अवलंबुन असल्याचे दिसत आहे.
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्लास्टीक कचऱ्यावर प्रक्रिया करून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून गावे, वाड्यांच्या परिसरात असलेल्या प्लास्टिक कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांगावात जनजागृती करून कचरा मुक्तीसाठी सामाजिक संस्थाचा प्रयत्न चांगला आहे. जिल्ह्यातील गावे प्लास्टिक कचरा मुक्त होण्यास मदत होणार आहे.
प्लास्टिक संकलन केंद्राची ठिकाणे अलिबाग तालुक्यातील चेंढरे, माणगाव निजामपूर, कर्जत पाषाणे, उरण चाणजे, पनवेल पालीदेवद, मुरुड काशिद, तळा बोरघर हवेली, श्रीवर्धन दिवेआगर, म्हसळा खामगाव, रोहा नागोठणे, महाड बिरवाडी, खालापूर तांबाटी, पेण वडखळ, सुधागड परळी, पोलादपूर कापडे बुद्रुक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आमच्याकडून पूर्ण क्षमतेने काम सुरु आहे. 10 ठिकाणी युनिट स्थापन करण्यात आले आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे. कचरामुक्ती करणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मानसिकता बदलण्यासाठी आम्ही जनजागृतीवर भर देत आहोत. काही प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यातून आम्ही मार्ग काढू.
शुभांगी नाखले, उपमुख्यकार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद