| मुंबई | प्रतिनिधी |
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली.त्यामुळे संतापलेल्या राजू शेट्टी यांनीही आपण आता राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य नेत्यांवर टीकाटिप्पणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्रही दिलं आहे. दरम्यान राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अद्याप याबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
- गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं. करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार असं माझं म्हणणं नाही आहे.- राजू शेट्टी,माजी खासदार
- विधानपरिषदेच्या 12आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही.आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. तीनही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा अशी अपेक्षा आहे.- जयंत पाटील,राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष