उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटीचा परतावा आदी विविध विषयांवर मोदींशी चर्चा केली. यावेळी त्यांनी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील कररावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लगणार नाही, अशी मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते.
मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून, त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षण, इतर मागासवर्ग आरक्षण, मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय, जीएसटीचा परतावा, शेतकर्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रश्न, पीक विमा, चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी, मराठा भाषेला अभिजात दर्जा आणि वादळग्रस्तांना मदतीचे निकष याबद्दल मोदींशी चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
राज्यपालांची मोदींकडे तक्रार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदींसमोर विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांचा मुद्दाही मांडला. सरकार बहुमतात आहे. कॅबिनेटने ठरावा केला आणि राज्यपालांना भेटलो. या 12 जागा जवळपास आठ महिन्यांपासून रिक्त आहेत. नियमावलीत ज्याप्रमाणे व्यक्ती निवडताना अटी असतात, त्या सर्वांचा त्यात समावेश आहे. तर तो मुद्दाही आम्हीही मोदींकडे मांडला, अशी माहिती अजित पवारांनी दिली.