। म्हसळा । वार्ताहर ।
रायगडातील 15000 नागरिक परदेशात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करुन आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दरमहिना 100 कोटींची उलाढाल होत आहे. मात्र अद्याप त्यांच्या लसीकरणाबाबत सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतला नसल्याने येथे वास्तव्य करुन असलेल्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
रायगड जिल्ह्यातील सुमारे 15000 हजार नागरिक परदेशात रोजगारनिमित्त आहेत. त्यातून सुमारे 100 कोटींची उलाढाल दरमहा होते. त्यातील बहुतांशी नागरिक हे 45 आणि त्यापेक्षा कमी वयोगटातील आहेत. सध्या देशात 45 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना व्हॅक्सीन दिले जात आहे. परदेशात मात्र व्हॅक्सीन शिवाय येण्यास परवानगी नसल्याने हे तरुण(45 वर्षाखालील व्यक्तींना) रोजगार असूनही केवळ व्हॅक्सीनची सुविधा नसल्याने बेरोजगार होऊन बसायची वेळ आल्याने चालनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस मुसद्दीक इनामदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री नाम. राजेश टोपे आणि आम. अनिकेत तटकरे यांच्याजवळ याबाबत चर्चा केली. अजित पवार आणि आम. अनिकेत तटकरे यांनी त्वरित संबंधित अधिकार्यांशी बोलून त्वरित याबाबत कार्यवाही व्हावी असे आदेश दिले असतानाही रायगड जिल्ह्याचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी याबाबत अजिबात गांभीर्य घेत नाहीत याबाबत संपूर्ण जिल्ह्यात चर्चा तर सुरु आहेच शिवाय वृत्तपत्रात्तूनही या बेजबाबदार अधिकार्यांच्या विरोधात वारंवार वर्तमान पत्रातून बातम्याही येतात. महत्वाच्या कामासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने हे कधीही फोन उचलत नाहीत. त्यामुळे अनेकांपुढे वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. 45 वर्षाखालील नागरिकांना त्वरित व्हॅक्सीन देण्यात यावी अशी मागणी म्हसळा -श्रीवर्धन तालुक्यातून होत आहे.