‘तौत्के’ग्रस्तांना 250 कोटींचे पॅकेज

मुंबई | प्रतिनिधी |

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावरील जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशातच या चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

सात जिल्हांत चक्रीवादळाचा परिणाम झाला. एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार  तोक्ते  चक्रीवादळात 72 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. पण महाराष्ट्र सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

भविष्यातील वादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर टाकण्यात येणार आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन या सर्व कामांची आवश्यकता वर्तवली असून त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. तसेच तोक्ते चक्रीवादळासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं बैठकीत ठरवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

Exit mobile version