अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचा बॅकअप; निवडकर्त्यांचा तिलक वर्मावर विश्वास
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघांचा एकदिवसीय विश्वचषक पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये खेळला जाणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तयारी सुरू केली असून, भारतीय संघही आतापासूनच त्यासाठी प्लॅनिंग करत आहे. यावेळी भारताच्या निवड समितीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी संघाच्या मिडल ऑर्डरसाठी पर्यायी खेळाडू म्हणून तिलक वर्माचे नाव समोर केले आहे.
2011 नंतर भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकता आलेला नाही. 2023 मध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती, मात्र ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात विजय मिळवत भारतीय चाहत्यांचे स्वप्न अधुरे ठेवले.त्यामुळे आता 2027 च्या विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक जिंकायचे आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीतील हा अखेरचा मोठा विश्वचषक ठरू शकतो. त्यामुळे भारतीय संघासाठी ही स्पर्धा आणखी खास ठरणार आहे. सध्या विश्वचषकासाठी भारताची टॉप ऑर्डर बरीचशी निश्चित असल्याचे दिसत आहे. डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल करू शकतात. त्यानंतर विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. त्यावेळी जर हार्दिक पंड्या फिट असेल, तर तो सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. मात्र, या फलंदाजीच्या क्रमात दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत. पहिली म्हणजे मधल्या फळीत एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याच्यासाठी योग्य पर्याय तयार नाही. दुसरी अडचण म्हणजे भारताच्या टॉप-5 मध्ये सध्या सर्वच उजव्या हाताचे फलंदाज आहेत. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती पर्याय शोधत आहे. त्यामध्ये तिलक वर्माचे नाव चर्चेत आले आहे.
तिलक वर्मा हा डावखुरा फलंदाज आहे. त्यामुळे त्याचा संघात समावेश झाल्यास भारताच्या फलंदाजीमध्ये डावखुरा पर्याय मिळेल. त्याचबरोबर गरज पडल्यास तो काही षटके गोलंदाजीही करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरसाठी बॅकअप म्हणून तिलक वर्माकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे त्याला ऑफ-स्पिन गोलंदाजीवर अधिक काम करण्यास सांगण्यात आले आहे. भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये सध्या नियमित गोलंदाजी करणारे फारसे पर्याय नाहीत. त्यामुळे मुख्य गोलंदाज आणि खालच्या फळीतील अष्टपैलू खेळाडूंवर अतिरिक्त दबाव येतो. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांना मधल्या फळीसाठी योग्य बॅकअप तयार करायचा आहे. हार्दिक पंड्या किंवा नितीश कुमार रेड्डी यांच्यापैकी कोणी दुखापतग्रस्त झाल्यास, टॉप ऑर्डरमधील एखादा खेळाडू किमान चार षटके टाकू शकेल, असा पर्याय संघाला हवा आहे. गेल्या काही काळात भारताला संघाचे संतुलन साधण्यासाठी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला खेळवावे लागले आहे.
तसेच, 2027 च्या विश्वचषकापर्यंत भारतातील काही प्रमुख खेळाडूंचे वयही वाढलेले असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत. केएल राहुलदेखील विश्वचषकापर्यंत 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचा होईल. रवींद्र जडेजाच्या विश्वचषकातील सहभागाबाबतही सध्या निश्चितता नाही. त्यात खेळाडूंच्या फिटनेसचा आणि दुखापतींचा परिणाम संघाच्या क्षेत्ररक्षणावरही होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचा बॅकअप तयार ठेवायचा आहे. त्यामुळे तिलक वर्मा याच प्लॅनचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.
न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा ठरणार
भारताची एकदिवसीय विश्वचषक 2027ची तयारी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यापासून वेग घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याआधी दि.27 सप्टेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळविली जाणार आहे. त्याच काळात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा टी-20 संघ जपानमध्ये असणार आहे. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषकासाठी पहिल्या पसंतीच्या खेळाडूंसोबत पूर्ण ताकदीने तयारी करण्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.आता तिलक वर्मा या संधीचे सोने करतो का? आणि 2027 च्या विश्वचषकासाठी स्वतःला बॅकअप पर्याय म्हणून सिद्ध करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागणार आहे..






