सिंघू सीमेवर पुन्हा संघर्ष पेटला

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

कृषी कायद्यांविरोधात 2 महिन्यांपासून आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. शेतकरी आंदोलनावर ठाम असताना स्थानिकांनी या भागात धाव घेतली आहे. हा परिसर मोकळा करण्याची मागणी करत त्यांनी शेतकर्‍यांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला केल्यानं तणाव वाढला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करत लाठीमार केला. 

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सिंघू सीमेवर शेतकरी गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागांमध्ये आज स्थानिक मोठ्या संख्येनं दाखल झाले. हातात तिरंगा घेऊन आलेल्या स्थानिकांनी मभारत माता की जयफच्या घोषणा दिल्या. आंदोलकांनी परिसर मोकळा करण्याची मागणी त्यांनी केली. स्थानिक आणि आंदोलक आमनेसामने वातावरण तापलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.

शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे गैरसोय होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळेच आंदोलकांनी परिसर मोकळा करण्याचं आवाहन स्थानिकांनी केलं. प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चावेळी हिंसाचार झाला. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज फडकवला. याचा निषेध स्थानिकांनी केला. आंदोलकांकडून झालेला हिंसाचार घटनेवरील हल्ला असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली. तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणादेखील त्यांनी दिल्या.

Exit mobile version