| सांगली | प्रतिनिधी |
संततधार सुरु असलेला पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे सांगलीतील आरवाडे पार्क या नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने 17 जणांचे संजयनगर येथील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले. कृष्णेची पाणी पातळी सकाळी आठ वाजता 29 फूट 4 इंचावर पोहचली असून इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 फूट आहे.
चांदोली धरणातून वारणा नदीत आणखी विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. बुधवारी सकाळी 11.30 वाजता 8874 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या 3800 क्यूसेक विसर्ग सुरू असून त्यात वाढ करुन वक्रद्वारद्वारे 7216 क्युसेक व विद्युत जनित्रमधून 1658 क्यूसेक असे 8874 क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला. पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून 9.30 वाजल्यापासून प्रति सेकंद 2 लाख क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे.