। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या नद्यांमध्ये सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. राज्याच्या जलसंधारण विभागाने मंजूर केलेले सिमेंट बंधारे यांना या विभागाकडून कार्यादेश देण्यात आले नाहीत, त्यामुळे आ.महेंद्र थोरवे यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेऊन मागणी केली. कर्जत आणि खालापूर तालुक्यात सिमेंट काँक्रीट बंधारे बांधण्यात येणार आहेत. 23 ठिकाणी असे बंधारे कर्जत तालुक्यातील चिल्हार, पोश्री, उल्हास नद्यांमध्ये बांधले जाणार आहेत. त्या सर्व बंधार्यांना राज्याच्या जलसंधारण विभागाने मान्यता दिली असून जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील कार्यालयाने अद्याप कार्यादेश दिले नाहीत. त्याबाबत आ.महेंद्र थोरवे यांच्या पत्रानुसार मंत्रालयात जलसंधारण मंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नाशिक येथील जलविज्ञान विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करुन प्रस्तावित बंधार्यासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल आमदार थोरवे यांचे कौतुक केले. मंत्रालय स्तरावरील या बैठकीला जलसंधारण विभागाचे अतिरिक्त सचिव नंदकुमार, कार्यकारी संचालक कुशिरे, नलावडे आदी उपस्थित होते.