सार्वजनिक मालमत्तेचे 237 कोटीचे नुकसान

। चिपळूण । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात सार्वजनिक मालमत्तेचे 237 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली. चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पालकमंत्री परब यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी महापुराची कारणे आणि सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
पंचनामा करताना कर्मचार्‍यांनी निकषाची पट्टी फार लावू नये. लोकांना मदतीचा हात मिळेल, याकडे लक्ष द्यावे. पूरग्रस्तांना मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. त्यामुळे बाधित लोकांनाच ही मदत मिळेल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. शहरासह लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. घरे व दुकानांतून निघालेला चिखल आणि खराब झालेल्या वस्तूंचे ढीग रस्त्यावर साचत आहेत. यातून आगामी काळात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचा धोका आहे. त्यातून लेप्टोची साथ वाढू नये, त्यासाठी आतापासूनच खबरदारी बाळगावी.संस्था, कंपन्या, तरुण मंडळे, विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून खासगी डॉक्टर्स पूरग्रस्तांच्या मदतीला पाठवले जात आहेत. त्यांचेही प्रशासनाने नियोजन करून बाधित कुटुंबांना दिलासा द्यावा. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण सार्वजनिक मालमत्तेचे 237 कोटींचे नुकसान झालेले आहे.
या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना तातडीच्या कामाचे प्रस्ताव एक दिवसात देण्याची सूचना दिली. तसेच प्रस्ताव न देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी आ. भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, डॉ. इंदुराणी जाखड, मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.

Exit mobile version