। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 350 कोटी रुपयांचा निधी देण्यात येतील. या निधीच्या माध्यमातून तिथी आणि तारखेनुसार अशा दोन्ही राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारी साठी आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत बोलत होते.
350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा वर्षभर साजरा करण्यात येणार आहे या निधीच्या माध्यमातून आवश्यक असणार्या पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत रायगड किल्ला संवर्धनासाठी राज्य शासनाने प्राधिकरणाला तब्बल 600 कोटी रुपयांचा निधी आधीच दिलेला आहे त्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू आहेत काही ठिकाणी पुरातत्त्व विभागाच्या अडचणी निर्माण झाल्याने कामे संथ गतीने सुरू आहेत मात्र याबाबत संबंधित विभागाशी बोलून विकास कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात येतील असे सामंत यांनी स्पष्ट केले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे हे 350 वे वर्षे आहे त्या निमित्ताने विविध कार्यक्रम वर्षभर पार पडणार आहेत हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी विविध पायाभूत सुविधा देखील उभारण्यात येणार आहेत सध्या राज्य सरकारने पोलीस विभागाला सीसीटीव्ही बसवण्यासाठी 50 लाख रुपये दिले आहेत तसेच बॅरिगेट्स बसवण्यासाठी दीड कोटी रुपये दिले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दीड कोटी रुपये सुपूर्द केले आहेत असेही सामंत यांनी स्पष्ट केले. गडावर आणि गडाच्या परिसरात पेंडॉल व्यवस्थापन, आरोग्य सुविधा पाणी , कचर्याचे व्यवस्थापन, जिजाई समाधीची डागडूजी, रोपवे, मोबाईल्स रेंज अशी विविध कामे सुरू करण्यात येत आहेत.
रोपवे मार्फत गडावर अन्नछत्रासाठी लागणारे साहित्य घेऊन जावे लागते रोपे साठी जो काही निधी लागणार आहे तो रोपवे प्रशासनाला राज्य सरकार मार्फत देण्याची तजवीज करण्यात आली आहे शिवराज्याभिषेक दिन सोहळा तिथीनुसार आणि तारखेनुसार अशा दोन्ही पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा दोन्ही संस्थांच्या विचार विनिमयाने साजरा केला जाणारा आहे यासाठी दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची लवकरच बैठक पार पडणार आहे एमटीडीसी ची जी जागा उपलब्ध आहे त्यातील एक जागा समितीला देण्यात येणार आहे तर दुसरी जागा पुरातत्त्व विभागाला देण्याचे नियोजन आहे.
रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आकर्षक निसर्गरम्य समुद्रकिनारी लाभले आहेत पर्यटक नेहमीच मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात हा धागा पकडून यावर्षीपासून रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे यासाठी लागणार्या निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणार आहे असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
कोकणातील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे याआधी रत्नागिरीमध्ये रोजगार मिळावा घेण्यात आला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला मात्र नोकरीच्या संधी या जिल्ह्याबाहेर असल्याने स्थानिक तरुणांनी जिल्हा सोडून जाण्यास नकार दिला आहे त्यांना घराजवळच नोकरी हवी आहे कोकणातील तरुणांची याबाबतची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याकडे सामंत यांनी लक्ष वेधले.
अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाची इमारत अतिशय जुनी झाली आहे या ठिकाणी लवकरच नवीन इमारत बांधण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत गेल्या काही वर्षापासून जिल्हा सरकारी रुग्णालयाच्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे मात्र खर्च करून तो वाया जाणार आहे यासाठी त्या ठिकाणी नव्यानेच सुसज्ज इमारत उभारण्यात येणार आहे, आतापर्यंत झालेल्या खर्चाचे ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड किल्ला जतन,संवर्धन व विकास आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी योगेश म्हसे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.