300 कोटींचा खर्च अपेक्षित
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मागील 35 वर्षाहून अधिक काळ वापरात असल्याने जीर्ण झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांची दुरिस्थीचे काम हाती घेण्यात आले आहे. युद्धपातळीवर हे काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या जल वाहिन्यांच्या जागी नवीन वाहिन्या बसविल्या जाणार असल्याने या आधी होत असलेली पाणी गळती थांबणार असल्याचा विश्वास एमजीपी च्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
पनवेलसह इतर भागात पाणीपुरवठा करणार्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणयांच्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येत असून सुमारे 300 कोटी रुपयांच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येत असून काही ठिकाणी याची कामे सुरु करण्यास सुरुवात झालेली आहे. एकूण 37 किमी इतक्या अंतराच्या नवीन जलवाहिन्या बदलण्यात येत असून सप्टेंबर 2024 पर्यंत या वाहिन्या बदलून होणार असल्याचे एमजीपी प्रशासनाने सांगितले आहे.
सध्या पनवेल तसेच कळंबोली जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या जलवहिन्यानां लागलेल्या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून पनवेल हद्दीतील शहरांना मुबलक पाणी पुरवठा होण्याच्या खूप समस्या उद्धभवत आहेत. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या समस्येचे निवारण या दुरुस्थी कामामुळे होण्यास मदत होईल.
वाहत्या पाण्यात वाहनांची धुलाई
पनवेल मुंब्रा महामार्गावर असलेल्या आसुडगाव नजीक एचपी पेट्रोल पंपा शेजारी सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती रस्त्यावर होत असल्याने या ठिकाणी लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे. या वाहत्या पाण्याचा उपयोग रिक्षा, मोटर सायकल, मोठ मोठी वाहने धुण्यासाठी होत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. वाहने धुण्यासाठी रस्त्याच्या कडेला ही वाहने उभी करून धुतली जात असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण भेटत आहे. गेल्या काही महिन्यांनपासून या ठिकाणी पाण्याची गळती सुरु असून रस्त्यावर वाहत येणार्या या पाण्याने बर्याचवेळा वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत .
गळती थांबणे अशक्य
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या कळंबोली सर्कल येथील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी गळतीमुळे अक्षरशा तळे साचले असून या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ही गळती थांबवणे शक्य झालेले नाही. यासाठी गाडी नदी भिंगारी येथून कळंबोली जवळील जीर्ण झालेल्या 7.7 किमी च्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ते काम काही महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर येथील गळती पूर्ण थांबणार असल्याचे एमजीपी उपअभियंता काशीराम पाटील यांनी सांगितले.
पाणी हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नेहमीच कटिबद्ध असते. येत्या दोन वर्षात पनवेल परिसरासह जीर्ण झालेल्या जलवाहिन्या संपूर्ण बदलून नवीन जलवाहिन्यांचे कामसुरू करण्यात आलेला आहे. यासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे .
व्ही.के. सूर्यवंशी
अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण