महाराष्ट्रासह कोल्हापूर उपउपांत्यपूर्व फेरीत
। भुवनेश्वर । वार्ताहर ।
बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्र व कोल्हापूरच्या मुले व मुलींनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी मणीपुरला 18-5 एक डाव 13 गुणांनी नमविले.
मुलींनी तेलंगणाचा 23-3 असा एक डाव राखून धुव्वा उडविला. दिपालीने आपल्या धारदार आक्रमणात सहा गडी टिपले. गौरी शिंदे हीने नाबाद तीन तर सरिता दिव्या व जानव्ही पेठे यांनी प्रत्येकी 2.30 पळती केली. कोल्हापूरच्या मुलांनी शेवटच्या साखळी सामन्यात मध्यभारतचा 30-13 असा 17 गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात त्यांनी राजस्थानवर 10-07 असा एक डावाने विजय मिळविला.