कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदत केंद्राकडून देण्यात येणार आहे. त्याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबतच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूच्या दाखल्यात कोरोनामुळे मृत्यू झाला, असा उल्लेख नसेल तरी त्या व्यकीच्या कुटुंबीयांना मदत मिळणार आहे.

घरातील एखाद्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना ही मदत दिली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांपेक्षा ही रक्कम नक्कीच जात आहे, असे न्यायमूर्ती एम आर शाह आणि न्यायमूर्ती ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. अर्ज सादर केल्याच्या 30 दिवसांच्या आत ही रक्कम वितरित केली जावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. कोरोना मृत्यू होण्यापूर्वी 30 दिवसांच्या कोरोना रुग्णाने बाह्यरुग्णालय किंवा कुठल्याही रुग्णालयात कोरोनाची चाचणी केलेली असणे गरजेचे आहे. अशाच व्यक्तीचे कुटुंब मदतीसाठी पात्र ठरणार आहे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

घरात किंवा कुठेही कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीचे कुटुंबीय देखील मदतीसाठी पात्र असतील. मात्र, संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाला हे प्रशासनाला पटवून द्यावे लागेल. महत्वाचे म्हणजे मृत्यूच्या दाखल्यात कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, असं कारण नसेल तर कुठलंही राज्य सरकार मदत नाकारू शकत नाही. म्हणजेच मृत्यूच्या दाखल्यात कोरोनामुळे मृत्यू झाला, याचा उल्लेख नसेल आणि खरंच कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांना देखील मदत दिली जाणार आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे.

Exit mobile version