59 शाळाबाह्य तसेच स्थलांतरित मुले शिक्षणाच्या प्रवाहात
| खास प्रतिनिधी | रायगड |
जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम दि. 5 ते 20 जुलैदरम्यान राबविण्यात आली. या मोहिमेत 37 शाळाबाह्य तसेच 22 स्थलांतरीत मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या या उपाययोजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शून्य गळतीला खरंच ब्रेक लागणार का, हा खरा प्रश्न आहे.
या शोधमोहिमेत 18 मुले, 19 मुली अशी एकूण 37 शाळाबाह्य मुले सापडली असून, या सर्व मुलांना जवळच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. तसेच इतर जिल्ह्यांतून रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होऊन आलेले 16 मुले व 6 मुली अशा 22 मुलांनी कोणत्याही शाळेत प्रवेश घेतला नसल्याचे दिसून आले. या मुलांनाही शाळेत दाखल करून घेण्यात असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजिटल शाळा, आयएसओ मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षा तयारी, नवोदय परीक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र, शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन सदर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, जिल्ह्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य, स्थलांतरित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला.





